Rohit Pawar on Shiv Sena Merger: भविष्यात शिंदे आणि ठाकरे या दोन्ही शिवसेना गटांनी एकत्र यायला हवे, एकत्र येऊन काम करायला हवे, असे वक्तव्य अंबादास दानवे यांनी व्यक्त केले होते.

Rohit Pawar on Shiv Sena Merger: विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दोन्ही शिवसेनेच्या एकत्रिकरणावर केलेल्या एका विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. “भविष्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही शिवसेना गटांनी एकत्र यायला हवे आणि एकत्र येऊन काम करायला हवे,” असे मत दानवे यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या विधानाचे आता अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. भविष्यात खरंच शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येणार का? ते शक्य आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच, आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
Rohit Pawar on Shiv Sena Merger: “शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे दात नसलेले वाघ”
रोहित पवार म्हणाले की, “शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे भाजपला सोडून कधीही जाणार नाहीत. अजितदादा असे एकमेव नेते होते, ज्यांनी भाजपला सोडले असते, कारण 2029 मध्ये अजित पवार मुख्यमंत्री झाले असते. मात्र आता असे धाडस कोणीही करणार नाही. कारण शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजे दात नसलेले वाघ आहेत, जे फक्त गुरगुरत आहेत. त्यांची अस्वस्थता ही केवळ सत्तेसाठी आहे, आम्ही मात्र जनतेच्या प्रश्नांसाठी अस्वस्थ आहोत,” असे त्यांनी म्हटले आहे.

Rohit Pawar: विधानपरिषदेच्या तिकिटासाठी भांडताय, मग शेतकऱ्यांसाठी का भांडत नाही?
दरम्यान, कांद्याला बाजारपेठेत कवडीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) प्रचंड संकटात सापडला आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे (Anti-farmer Policies) कांद्याचे दर सातत्याने घसरत असून, बळीराजाच्या मनात सरकारविरोधात तीव्र रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, आज पुणे-नाशिक महामार्गावरील मंचर येथे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने भव्य मोर्चा काढण्यात येत आहे. या आंदोलनापूर्वी आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला.
रोहित पवार म्हणाले की, आम्ही नाशिकनंतर पुण्यात आंदोलन घेतोय. या जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहे, त्यांची तशी मागणी आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जातायेत. मुख्यमंत्र्यांनी आधी 12.50 रुपये दर सांगितला. मग निवडणुकीपूर्वी 24 रुपये दर देणार म्हणाले होते. म्हणून आम्ही हा दर देण्याची मागणी केली. आंदोलन सुरु केलं तेव्हा 7 ते 8 रुपये दर होता. दुसऱ्या आंदोलनावेळी 12.50 रुपये दर सरकारने केला. मात्र आमची मागणी 24 ते 25 रुपये हमीभाव देण्याची मागणी आहे. 10 लाख टन कांदा खरेदी करावा. व्यापारी शेतकऱ्यांकडून 4 ते 5 रुपयांनी कांदा खरेदी करतात आणि नाफेडला कांदा विक्री करतात. यातून व्यापाऱ्यांचा फायदा होतोय. त्यामुळं थेट शेतकऱ्यांकडून नाफेडने कांदा खरेदी करावा. दुर्दैवाने अद्याप तशी खरेदी सुरु झालेली नाही. आजच्या मुंबईत होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत याबाबत ठोस निर्णय व्हावा, अशी मागणी त्यांनी केलीय.
रोहित पवार पुढे म्हणाले की, नाशिकमध्ये नाफेडद्वारे कांदा खरेदी करावी, असे आदेश दिलेत. मात्र प्रत्यक्षात नाफेडद्वारे खरेदी सुरु झालेली नाही. दिल्लीत झालेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली ही आम्हाला कल्पना नाही. मुळात तसा अद्यादेश आलेला नाही, त्यामुळं ही केवळ घोषणा केली का? शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. माझं दिलीप वळसे पाटलांना म्हणणं आहे की, शेतकऱ्यांनी मागणी केल्यानं आम्ही आंदोलन करतोय. एसीमध्ये बसून प्रश्न सुटणार नाहीत. तुम्ही केवळ माध्यमांत बोलू नका. रस्त्यावर येऊन चर्चा करा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही भांडायला हवं. पण, तुम्ही विधानपरिषदेच्या तिकिटासाठी भांडताय. घोडेबाजार करताय, मग शेतकऱ्यांसाठी का भांडत नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.













