Maharashtra Weather Updates: हवामान विभागाने(IMD)वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यभरात पावसानं धुव्वाधार बॅटिंग केली असून येणारे 24 तास महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहेत.

Maharashtra Weather Updates: भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यभरात पावसानं धुव्वाधार बॅटिंग केली असून यात अनेक जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढलं आहे. तर येणारे 24 तास महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहेत. हवामान विभागाने आज राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा (Maharashtra Rain) अंदाज वर्तवला आहे. ही मान्सूनची हालचाल प्रामुख्याने ओडिशावरील तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे होत आहे, जो आता पश्चिमेकंदील विदर्भ आणि छत्तीसगडच्या दिशेने सरकत आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सूनचा जोर पुन्हा वाढला आहे. हवामान विभागाने विदर्भातील (Vidarbha Rain Marathi News) चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात 31 जुलैपर्यंत अतिवृष्टी, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. जळगावसाठीही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची (Vidarbha Rain Marathi News) शक्यता आहे. संभाव्य धोका लक्ष्यत घेता नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Rain Marathi News)
Amravati Rain: अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस
दरम्यान, अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला आहे. यात पावसाच्या विळख्यात सापडलेल्या 100 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला आहे. परिणामी नदी नाल्याला पूर आला असून नदीकाठी घर असलेल्या सुमारे 100 लोकांना सुरक्षित स्थळी रात्री हलवण्यात आले. नांदगाव खंडेश्वर मधील धामक, धानोरा गुरव, मंगरूळ चव्हाळा, खेड पिंपरी, परसमंडळ, दिघी कोल्हे या गावासह अनेक गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. गावाला नदी नालाची स्वरूप आले. तर सातरगाव परिसरात मेंढी नाल्याच्या पुरात आल्याने यात एक दुचाकीस्वार वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नांदगाव खंडेश्वर शहरात देखील पावसाने कहर माजवला गावात पाणीच पाणी दिसून आल तसेच शेती खरडून निघाल्या आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सर्व शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. 100 लोकांना नांदगाव खंडेश्वरच्या मंगल कार्यालयामध्ये रात्री उशिरा व्यवस्था करून त्यांना ठेवण्यात आलं.
Yavatmal: यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, सर्व शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. हा आदेश सर्व शासकीय, अनुदानित व खासगी शैक्षणिक संस्थांना लागू राहणार आहे. संभाव्य पूरस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही जीवितहानी किंवा अनुचित घटना घडू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. नदी, नाले, ओढे, बंधारे व पूरप्रवण भागात जाणे टाळावे, पाण्याने भरलेले रस्ते किंवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. विजांचा कडकडाट होत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबू नये. वाहनचालकांनी पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून वाहन चालवू नये. अश्या सुचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे.
Mumbai Rain: मुंबईत पावसाची शक्यता, ठाण्याला आज यलो अलर्ट
मुंबईत आज हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच वाऱ्याचा वेग ही जास्त असण्याचा अंदाज ही विभागाने दिला आहे. सध्यस्थित मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पच्छिम उपनगरात पावसाने विश्रांती घेतलेली आहे. तर दुसरीकडे ठाण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. आज ठाण्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. रात्रीपासून अधून मधून पावसाचा जोर कायम असून गेल्या 22 तासात 31.29 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अद्याप कोणत्याही सखोल भागात पाणी साचलं नाही, मात्र मध्य रेल्वेची वाहतूक 5 ते 7 मिनिटं उशिराने सुरु असल्याची माहिती आहे.
Buldhana Rain: संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टी, सातपुडा पर्वतात ढगफुटी सदृश पाऊस
बुलढाणा जिल्ह्यात रात्रभर सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात तर अतिवृष्टी झाली असून सातपुडा पर्वतात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात अनेक नदी आणि ओढ्यांना महापूर आले आहेत. या परिसरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 G हा अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी असल्याने ठप्प झाला आहे. तर पुरामुळे अनेकांच्या शेतीत पाणी शिरल्याने पिकांचे ही नुकसान झालं आहे. गेल्या 24 तासांपासून जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पाऊस असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.
IMD : या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
ऑरेंज अलर्ट अंतर्गत असलेल्या जिल्ह्यांमध्ये पालघर, नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा यांचा समावेश आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील घाट परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. अचानक येणारे पूर आणि भूस्खलनाच्या धोक्यामुळे प्रशासनाने नागरिकांना या भागात सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
प्रमुख शहरांमधील परिस्थिती
मुंबई आणि ठाणे: येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सांताक्रूझ वेधशाळेनुसार, मुंबईत आज ढगाळ आकाश आणि मुसळधार पाऊस पडेल. शहरात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तापमान 25°C ते 30°C च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
पुणे: शहरात ढगाळ आकाश, मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान सुमारे २३°C आणि किमान तापमान सुमारे २१.८°C राहील.
नाशिक: येथे आज पावसाची १००% शक्यता आहे. दिवसभर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून, वाऱ्याचा वेग ताशी ३२ किमी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
नागपूर: विदर्भातील या प्रमुख शहरालाही मुसळधार पावसाचा फटका बसेल, त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.













