Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसच्या बाभूळगाव येथून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आदल्या दिवशी मोठ्या हर्षउल्हासात पार पडलेल्या लग्नसोहळ्याच्या दुसर्याच दिवशी काळानं घात केलाय.
Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसच्या बाभूळगाव येथून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आदल्या दिवशी मोठ्या हर्षउल्हासात पार पडलेल्या लग्नसोहळ्याच्या दुसर्याच दिवशी काळानं घात केला आणि नववधूला हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने प्राण सोडावा लागलाय. ही दुर्दैवी घटना बाभूळगावच्या पराडे-गळगुंडे या परिवारात घडली असून कुटुंबियासह परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे. जीवनातील महत्त्वाचा मानला जाणारा लग्न सोहळा पार पडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच नववधूचे असे अकाली निधनाच्या वृत्तानं संबंध तालुका हळहळला आहे.

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूने घेतला जगाचा निरोप, घोटी गाव हळहळलं
पुढे आलेल्या माहितीनुसार, समीर हरिदास पराडे यांचे 13 मे रोजी घोटी (ता. माढा) येथील जानकी बाळासाहेब गळगुंडे यांच्याशी मोठ्या दिमाखात विवाह सोहळा संपन्न झाला. नीरा नरसिंहपूर येथील मंगल कार्यालयात हा दिमाखदार सोहळा पार पडला. लग्नानंतर नववधू सासरी आली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक छातीत कळा येऊ लागल्याचं जाणवलं. त्यानंतर कुटुंबियांनी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ जानकी यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं अन् अकलूज येथील खासगी हॉस्पिटलकडे घेऊन जात असताना प्रवासादरम्यान नववधूवर काळाने झडप घातली. वाटेतच जानकी यांना मृत्यूनं गाठलं. सासरच्या सुनेचा आणि माहेरच्या लेकीचा अचानक झालेल्या मृत्यूने दोन्ही कुटुंबाने यावेळी एकच टाहो फोडला. यानंतर मृत्यू झालेल्या जानकी हिच्यावर बाभूळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी संपूर्ण गाव हळहळला.
इतर महत्वाच्या बातम्या











