Ujjani Dam: उजनी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच धरण यंदा जून महिन्यातच 50 टक्केच्या पुढे भरले असून धरणात सध्या जवळपास 91 टीएमसी पाणीसाठा जमा झालेला आहे.
Solapur News: उजनी धरणाच्या (Ujjani Dam) इतिहासात पहिल्यांदाच धरण यंदा जून महिन्यातच 50 टक्केच्या पुढे भरले असून धरणात सध्या जवळपास 91 टीएमसी पाणीसाठा जमा झालेला आहे. यावर्षी मान्सून पूर्व पावसाने घातलेल्या धुमाकूळामुळे उजनी धरण वजा 23 टक्क्यातून आधीक 50% असा प्रवास केवळ 30 दिवसात पूर्ण केला आहे. गेल्या वर्षी उजनी धरण 3 ऑक्टोबरला पन्नास टक्के भरले होते. यावर्षी मात्र 17 जून रोजी 50% ची पातळी धरणाने ओलांडली आहे.
सध्या पुन्हा एकदा मान्सूनच्या आगमनानंतर पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणात 14 हजार 642 क्युसिक विसर्गाने पाणी जमा होत आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास पुढच्या पंधरा दिवसात उजनी धरण 100% भरण्याची शक्यता आहे. यामुळे यंदा उजनी धरणा मुळे महापुराची शक्यता तज्ञांकडून वर्तविले जात आहे.
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 12 फुटांची वाढ
दुसरीकडे राज्यात ठिकठिकाणी दमदार पाऊस कोसळला असून पाणी टंचाईचे संकट मिटले आहे. अशातच, कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात रात्रीपासून पावसाची उघडीप आहे. मात्र गेल्या 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 12 फुटांची वाढ झाली आहे. पंचगंगेची पाणी पातळी 25 फूट 11 इंचांवर पोहचली असून राजारामसह 18 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत धरणात अधिकचा साठा असल्याने भविष्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेता धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राधानगरी धरणाच्या पायथा विद्युतगृहातून 2500 क्युसेक पाण्याचा प्रतिसेकंद विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे. तर कुंभी धरणातून 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग कुंभी नदीपात्रात सुरू आहे. पर्यायाने पंचगंगा नदीपात्रात पाण्याची मोठी आवक होत असल्याने गेल्या 24 तासात पाणी पातळीत कमालीची वाढ झाली.











