जून महिन्यात देशातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Rain Monsoon update: भारतात अलनिनोच्या (Al Nino) धास्तीमुळे नैऋत्य मोसमी पावसाचा (Southwest Monsoon) वेग मंदावला आहे. यंदाच्या उन्हाच्या काहिलीने पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांना आता आणखी काही दिवस आभाळाकडे डोळे लावून बसावं लागण्याची चिन्हे आहेत. (Weather Update) एवढेच नाही, तर महाराष्ट्रभरात पुढील 2 ते 3 दिवस उष्णतेच्या लाटा आणि दमट हवामानाचे इशारे देण्यात आले आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, प्रशांत महासागरात अलनिनो विकसित होत असल्याचा परिणाम नैऋत्य मोसमी पावसावर होणार आहे. त्यामुळे जून महिन्यात देशातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील मान्सूनची वाटचाल गेल्या आठवड्याभरापासून मंदावली आहे. 25 जूननंतर मान्सूनला गती मिळण्याची शक्यता हवामान तज्ञ व्यक्त करत आहेत. सध्या कोकणातील हरणे ते सोलापूर पट्ट्यातच स्थिरावलेल्या मान्सूनची पुढची वाट खडतरच असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये 19 जूनपर्यंत उष्णतेच्या लाटा
महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. आज विशेषतः पालघर, ठाणे, मुंबई ,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,धुळे ,जळगाव, नाशिक, सोलापूर ,छत्रपती संभाजीनगर, जालना परभणी बीड, हिंगोली, नांदेड या भागात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात अकोला अमरावती बुलढाणा वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला असून गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
18 आणि 19 जूनला पालघर, ठाणे ,मुंबई ,रायगड, रत्नागिरी भागात उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना,बीड, अकोला या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे . त्यानंतर विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत पाऊस कधी येणार?
मिळालेल्या माहितीनुसार , कमकुवत मान्सूनचा प्रवाह आणि वायव्येकडून वाहणारे उष्ण वारे यांची प्रणाली याचा परिणाम मान्सूनच्या पुढील वाटचालीवर होणार आहे. आठ जूनपासून महाराष्ट्रातल्या मान्सून रेषेत विशेष बदल झालेला नाही. हवामान विभागाच्या मते, मान्सून कमकुवत होण्याचे कारण समुद्रातील आद्रतेची कमतरता नसून वरच्या वातावरणातील वाऱ्यांची असामान्य रचना आहे. पश्चिमी जेट्स स्ट्रीम नेहमीपेक्षा अधिकदक्षिणेकडे सरकल्यामुळे मान्सूनला गती देणाऱ्या वाऱ्यांवर परिणाम झाला असून, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागरात आर्द्रता असूनही वेग मंदावला आहे.
दरम्यान कोकणातील हर्णे ते सोलापूर पट्ट्यातच ठरवलेला मान्सून 25 जूननंतर मुंबईसह कोकणात पुढे सरकण्याची शक्यता आहे. 25 जून ते 1 जुलै या कालावधीत मान्सूनला मुंबईसह संपूर्ण कोकणात अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे . त्यानंतरच मध्य महाराष्ट्र व मराठवाडा विदर्भात मान्सून दाखल होईल.















