बेळगावात ‘सैराट’ चित्रपटाची पुनरावृत्ती झाली आहे. दुसऱ्या जातीच्या तरुणासोबत पळून गेल्याने, माहेरच्या लोकांनीच 24 वर्षीय बहिणीसोबत जे केलं ते ऐकून तुमच्याही हृदयाचा थरकाप उडेल. नेमकं काय घडलं तिथे ?
सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग ? समाज, समाजातील लोक काय म्हणतील याची भीती अनेकांच्या मनात असते आणि त्याच भीतीपायी कधीकधी असं काही केलं जातं की क्षणात होत्याचं नव्हतं. जातीबाहेर लग्न आपल्याकडे आजही बहुतांश ठिकाणी मान्य केलं जात नाही आणि त्यातूनही कोणी तसं केलंच, तर फार कमी ठिकाणी ते स्वीकारलं जातं. अनेक वर्षांपूर्वी आलेल्या नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ या चित्रपटात जातीचंहेच वास्तव प्रखरपणे दाखवण्यात आलं होतं, ज्यामध्ये पळून जाऊन, लग्न करून सुखाने संसार करणाऱ्या आर्ची आणि परश्याचं निर्घृणपणे खून केला जातो.
साधारण 10 वर्षांपूर्वी आलेल्या याच सैराटची पुन्हा पुनरावृत्ती झाली आहे. पतीला सोडून दुसर्या जातीच्या तरुणासोबत पळून गेल्याच्या रागातून माहेरच्या लोकांनीच आपल्या मुलीला जबरदस्तीने विष पाजून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला . बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यामध्ये सैराटची पुनरावृत्ती झाल्याचे उघडकीस आलं.
दुसऱ्या जातीतील प्रियकरासोबत पळून गेलेल्या बहिणीला तिच्याच भावांनी ठार केलं. एवढंच नव्हे पुरावा मिटवण्यासाठी तिचा मृतदेहाचंदहन केलं. सांगली जिल्ह्यातील आरग येथे मृतदेह परस्पर दहन करून टाकल्याचंही तपासात उघड झालं असून या धक्कादायक घटनेमुळे सगळेच हादरले आहेत.
सत्यव्वा संतोष हेळवी (वय 24) असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून 21 मार्चला हा दुर्दैवी प्रकार घडला. काका आणि भाऊजीच्या मदतीने, भावाने बहिणीला विष पाजून संपवलं. याप्रकरणी सत्यव्वाचा काका प्रकाश भीमाप्पा हळवर (वय 46), भाऊ शानूर सदाशिव हळवर (वय 35) व भाऊजी कल्लाप्पा मायाप्पा हेळवी (वय 40, तिघेही रा. नदीगुडी, ता. हुक्केरी) अशा तीन संशयितांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 4 वर्षांपूर्वी सत्यव्वा हिचं रायबाग तालुक्यातील हणबरट्टी येथील संतोष हेळवी याच्याशी लग्न झालं. पण लग्नाआधीपासूनच तिचं तिच्याच गावातील कृष्णा पाटील नावाच्या तरूणावर प्रेम होतं. लग्नानंतरही त्यांचा एकमेकांशी संपर्क होता. फेब्रुवारी महिन्यात सत्यव्वा पतीच्या घरातून पळून प्रियकराकडे गेली . ते एकत्र रहायचे.
तुझं दुसरे लग्न आपल्या जातीतील तरुणाशी करून देतो, असे माहेरच्या लोकांनी सत्यव्वाला सांगितलं. पण ती काहीच ऐकायला तयार नव्हती, म्हणून त्यांनी त्याच रात्री त्यांनी तिला जबरदस्तीने पकडून विष पाजले. तिचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा मृतदेह आरग स्मशानात जाळला.











