काल संध्याकाळी पत्रकार परिषदही पार पडली, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. याचवेळी महायुतीच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोरच एकमेकांना टोला लगावला.
राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून राज्यातील विविध मुद्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक सज्ज आहेत. तर विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीही कंबर कसली आहे. हे अधिवेशन संपूर्णपणे चार आठवडे चालणार आहे. त्यापूर्वी काल चहापानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, मात्र विरोधकांनी त्यावर बहिष्कार टाकला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काल संध्याकाळी पत्रकार परिषदही पार पडली, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. याचवेळी महायुतीच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोरच एकमेकांना टोला लगावला. एकनाथ शिंदेंनी केलेल्या विधानानंतर अजित पवारांनीही त्यांना मिश्किल शब्दांत उत्तर दिलं, त्याचीच सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
अजित पवारांना टेन्शन नाही, शिंदे असं का म्हणाले ?
मी व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोणतेही ‘शीतयुद्ध’ नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केलं. तर उपमुख्यमंत्री अजितल पवारांच्या निवेदनानंतर एकनाथ शिंदेंनी बोलण्यास सुरूवात केली.”सरकारची नवी टर्म असली, तरी आमची टीम जुनीच आहे. फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची अदलाबदल झालेली आहे, असं एकनाथ शिंदे (फडणवीसांकडे बोट दाखवत) म्हणाले. अजितदादांची मात्र फिक्स आहे. दादांचं बरं आहे,नो टेन्शन.” अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. त्यांचं हे विधान ऐकून फडणवीस आणि अजित दादा दोघांनाही हसू आवरलं.
तुम्हाला फिक्स ठेवता आली नाही तर…
मात्र त्यांच्या या विधानानंतर अजित दादांनीही हजरजबाबीपणा दाखवत शिंदेंना टोला लगावला. “तुम्हाला (खुर्ची) फिक्स ठेवता आली नाही, त्याला मी काय करू?” असा सवाल विचारत अजित पवारांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. अजित दादांचं विधान ऐकून एकच हशा फुटला. उपस्थित सर्वांसह एकनाथ शिंदे आणि फडणवीसही खळखळून हसू लागले. मात्र त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “ठीक आहे, आमच्यात समजूदारपणा आहे.” आणि तोच धागा पकडून फडणवीसही म्हणाले की, “आमची फिरती खुर्ची ( रोटेटिंग) आहे.”
‘हम आपके हैं कौन’, मुख्यमंत्री असं का म्हणाले ?
यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांच्या एकजुटीवर उपरोधिक टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या. विरोधकांमध्ये एकी नसल्याचे त्यांनी दाखवून दिले. विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्याकडे ९ पानांचे पत्र दिले. त्यात नऊ नेत्यांची नावे आहेत. परंतु त्यातील दोन नेत्यांनी सह्याच केल्या नाहीत. यामुळे महाविकास आघाडीत ‘हम साथ साथ हैं’ नाही तर ‘हम आपके हैं कौन’ असे चित्र आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला.
दररोज नियमित चालून सुद्धा वजन कमी होत नाहीये? ‘या’ गोष्टी टाळा अन्यथा..