Raj Thackeray & Uddhav Thackeray Press conference: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकारपरिषद, मनसे-ठाकरे गटाच्या युतीची घोषणा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेली शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अखेर बुधवारी घोषणा झाली. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मनसे-ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केली. राज आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष मुंबईसह सात महानगरपालिकांमध्ये एकत्र लढणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचे युतीच्या घोषणेकडे लक्ष लागले होते. या पत्रकार परिषेदपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले होते. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे असे संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते.
वरळीत झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी शिवसेना-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे मी जाहीर करतो, असे सांगितले. माझी एक मुलाखत झाली होती. त्यावेळी मी कुठल्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचे म्हटले होते. माझ्या त्या वाक्यापासून शिवसेना-मनसे एकत्र येण्याची सुरुवात झाली. कोण किती जागा लढणार, हे आम्ही आताच सांगणार नाही. कारण महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत. त्यामध्ये आणखी दोन टोळ्यांची भर पडली आहे. ते राजकीय पक्षातील मुलं पळवतात. शिवसेना-मनसेच्या दोन्ही पक्षातील उमेदवारांना अर्ज कधी भरायचा, हे सांगितले जाईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले. यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित पत्रकारांनाही एक आवाहन केले. त्यांनी म्हटले की, ज्यांचं महाराष्ट्रावर आणि मुंबईवर प्रेम आहे, त्यांनी आमच्या पाठीशी उभे राहा, असे ते म्हणाले. तसेच राज ठाकरे यांनी मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असेही ठणकावून सांगितले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनीही आक्रमक भाषण केले. भाजपला मुंबईचे लचके तोडायचे आहेत, चिंधड्या करायच्या आहेत. आता आम्ही भांडत राहिलो तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांचा अपमान होईल. आम्ही कर्तव्य म्हणून एकत्र आलोय. आम्ही एकत्र आलोय, ते एकत्र राहण्यासाठी, हे मी पूर्वीच सांगितले आहे. यापुढे मुंबई आणि महाराष्ट्राकडे जो कोणी वाकड्या नजरेने पाहील त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपने कटेंगे तो बटेंगे असा अपप्रचार केला होता. आता मी मराठी माणसाला सांगतो की, आता चुकाल तर संपाल, त्यामुळे मराठीचा वसा टाकू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
फुटाल तर पूर्णपणे संपाल
यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीकडे बोट दाखवत चिमटे काढले. त्यांनी यावेळी मराठी माणसाला मोठे आवाहन केले आहे. गेल्यावेळी भाजपने नरेटिव्ह सेट केलं होतं कटेंगे तो बटेंग, असे ते नरेटिव्ह त्यांनी सेट केलं होतं. आता मी सांगतो,आता चुकाल तर संपाल. फुटाल तर पूर्णपणे संपून जाल हे मराठी माणसांना सांगतो.तुटू नका, फुटू नका. मराठीचा वसा टाकू नका,असे आवाहन त्यांनी मराठी माणसांना केलं आहे. त्यांनी मराठी मतदारांना मोठी हाक, मोठी साद घातली आहे. आता दोन्ही बंधू एकत्र आले आहेत. आता मराठी माणसांनी पाठीशी राहावं असं आवाहन एकप्रकारे उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
मराठी ऐक्याचा मंगल कलश
आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आहे.मी सकाळी कुणाला तरी सांगितलं की आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला तो मराठी ऐक्याचा मंगल कलश होता. आजही मराठी ऐक्याचा मंगल कलश घेऊन राज आणि उद्धव आले आहेत. तोच आनंदाचा क्षण घेऊन आले आहेत. हाच मंगल कलश मुंबईसह अनेक महापालिकेत विजयी भगवा फडकवल्याशिवाय राहू शकणार नाही. महाराष्ट्राला ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात. महाराष्ट्र ठाकरेंच्याच मागे राहील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या
Shivsena & MNS Alliance: युतीच्या घोषणेला 9 नंबरचा मुहूर्त?
24 डिसेंबर युतीच्या घोषणेची तारीख
2+4+1+2=9
27 नोव्हेंबर 2005 शिवसेना सोडण्याची घोषणा
2+7=9
18 डिसेंबर 2005 शिवसेना सोडण्याची तारीख
1+8=9
9 मार्च 2006 महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची घोषणा
18 मार्च 2006 शिवतीर्थावर पहिली सभा
1+8=9




