Maharashtra Rain Updates: भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील तब्बल 30 जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट जारी केला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Maharashtra Rain Updates)

मुंबईत काल दिवसभर ढगाळ वातावरण- (Mumbai Rain Updates)
मुंबई आणि ठाणे परिसरात आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काल मुंबईसह उपनगरातील अनेक भागांत हलक्या सरींचा शिडकावा झाला. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण होते.
मान्सूनच्या सुरवातीलाच पहिल्या पावसाच्या आगमनाने आंबोलीतील निसर्गाचे रुप पालटलं- (Amboli Ghat Rains Update)
मान्सूनच्या सुरवातीलाच पहिल्या पावसाच्या आगमनाने आंबोलीतील निसर्गाचे रुप पालटलं आहे. दाट धुकं, ऊन पावसाचा खेळ, अल्दादायक वातावरण यामुळे आंबोलीचे रूप अधिकच खुलल आहे. तर पहिल्याच पावसात आंबोलीचा मुख्य धबधबा काही अंशी प्रवाहित झाला आहे. काळ्याशार कड्यावरून पाण्याचे पांढरे शुभ्र प्रवाह आता हळूहळू खाली कोसळू लागले आहेत. निसर्गाचे हे सुंदर रूप पाहण्यासाठी आणि पहिल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले आंबोलीकडे वळू लागली आहेत. आंबोलीच्या मुख्य धबधब्यावरून पाण्याचे लहान प्रवाह वाहू लागल्याने आणि आजूबाजूला पसरलेली हिरवळ मनाला सुखावणारी आहे. त्यामुळे पर्यटकांची रेलचेल आंबोली घाटात पाहायला मिळत आहे. सध्या महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथून पर्यटक आंबोली घाटात हजेरी लावत आहेत. कड्यावरून कोसळणाऱ्या थंडगार पाण्यात भिजण्याचा आणि धुक्याची चादर अनुभवण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत.














