Sangli Father Beaten Daughter Girl Death : सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांनी मुलीला बेदम मारहाण केली. यात मुलगी गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सांगली : सांगलीत मुख्याध्यापक असलेल्या वडिलांनीच मुलीला मारहाण करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला नीट चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने त्या रागाच्या भरात वडिलांनी मुलीला जात्याच्या लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत मुलगी गंभीर जखमी झाली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सांगलीतील आटपाटी तालुक्यातील नेलकरंजी इथे हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. धोंडीराम भोसले असं लेकीला अमानुष मारहाण करणाऱ्या वडिलांचं नाव आहे.
नेमकं काय घडलं?
धोंडीराम भोसले या मुख्याध्यापक वडिलांनी त्यांची १७ वर्षीय मुलगी साधला हिला कमी गुण मिळाल्याने अमानुष मारहाण केली. यात मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. मुलीला नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तिला याचा जाब विचारला.
चाचणी परीक्षेत कमी गुण कसे पडले? असं विचारत त्यांनी लेकीला लाकडी खुंट्याने मारलं. कोणताही विचार न करता केवळ कमी गुण मिळाल्याचा राग त्यांनी लेकीवर काढला आणि तिला बेदम मारलं. मारहाण इतकी भयंकर होती, की मुलगी गंभीर जखमी झाली.
मुलगी इतकी गंभीर जखमी झाली तरी तिला शुक्रवारीच रुग्णालयात दाखल करण्यात आलं नाही. शुक्रवारी रात्री मारहाण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी धोंडीराम योगा डेसाठी सकाळी उठून निघून गेले. साधना घरातच बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिला सकाळी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं. वडिलांनी केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. दरम्यान, लेकीच्या मारहाणीबाबत मुलीची आई प्रीती भोसले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर रविवारी धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली.
मारहाण करणारे वडील स्वत: माध्यमिक शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक आहेत. त्यांची मुलीकडून नीटच्या परीक्षेत चांगले गुण मिळण्याची मोठी अपेक्षा होती. पण ती वडिलांची अपेक्षा पूर्ण करू शकली नाही आणि याचीच तिला मोठी शिक्षा दिली गेली. साधना अतिशय हुशार मुलगी असल्याचं सांगितलं जात आहे. तिला दहावीला ९२ टक्के गुण मिळाले होते. मात्र नीटच्या सराव-चाचणी परीक्षेत चांगले गुण ती मिळवू शकली नाही. त्याचाच राग वडिलांना अनावर झाला आणि त्यांनी तिला बेदम मारहाण केली आणि चिमुकल्या जीवाचा शेवट केला.