सोलापूर : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. दरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका निवडणुका कधी होऊ शकतात यासंबंधी महत्त्वाची अपडेट दिली आहे. ते म्हणाले की, पावसाळा झाला की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणुका होऊ शकतात. निवडणूक घेण्याचे अधिकार हे आयोगाला आहेत. आयोगाकडून निवडणूक घेतली जाईल त्यावेळी सरकार म्हणून यंत्रणा तयार आहे.
महायुती म्हणून एकत्र लढणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महायुतीवर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले की महायुतीमध्येच निवडणुका होतील. ज्या ठिकाणी जुळणार नाही त्याठिकाणी मैत्रिपूर्ण लढत होईल. त्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र येऊ.याचा अर्थ महायुतीत काही अडचण नाही असा होत नाही.असे मत चंद्रशेखर बावनकुळेंनी मांडले. भाजप म्हणून आम्ही सक्षमपणे तयार आहोत. लोकसभा निवडणुकीतून काही गोष्टी शिकलो. त्यानतंर चारच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही जिंकलो.
भाजपचं मुख्य लक्ष्य काय?
राज्यात लोकसभेत महाविकास आघडीला यश मिळाले होते. तर विधानसभेत महायुतीने चमत्कार घडवला.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दोन्ही गटांसाठी महत्त्वाच्या आहेत.येणाऱ्या निवडणुकीत भाजपचे मुख्य लक्ष्य हे मुंबई महापालिका आहे. सर्वात श्रीमंत महापालिका असलेली मुंबई महापालिकेवर गेली 25 वर्षे शिवसेना ठाकरे पक्षाची सत्ता होती. भाजपकडून गेल्या निवडणुकीत जबरदस्त टक्कर देण्यात आली होती.तर शिवसेना ठाकरे पक्षासाठी महापालिका निवडणूक ही अस्तित्वाची लढाई असणार आहे.
काय असणार राजकीय समीकरणे?
भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बहुतांश निवडणुका युती म्हणून एकत्र लढवण्याचा विचार आहे. तर महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही याबद्दल स्पष्टता बाकी आहे. मधल्या काळात राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा होत्या मात्र काही दिवसांत या चर्चा थांबल्या. जर हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यास चांगला प्रभाव टाकू शकतील. दोन्ही पवार गट एकत्र येऊ शकतात अशाही चर्चा रंगतात. मात्र नेमकं काय होणार हे लवकरच कळेल.
हेही वाचा