मुंबई- विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी महायुती सरकारने राज्यांमध्ये 1200 हून अधिक शासन निर्णय जाहीर केले आहेत. तत्पूर्वी, लाडकी बहीण योजना राबवली गेली आहे. या योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आले आहेत. मात्र याचा मोठा बोजा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडला आहे. त्यामुळे आता हा पडलेला खड्डा भरून काढण्यासाठी मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला त्याहून अधिक मोठा खड्डा पडणार आहे.
आजपासून (16 ऑक्टोबर) शंभर रुपये आणि दोनशे रुपयांचा मुद्रांक बंद करून थेट आता पाचशे रुपयांचाच मुद्रांकवर सर्व व्यवहार करावे लागणार आहेत. त्यामुळे शंभर आणि दोनशे रुपयांचा मुद्रांक बंद केल्याने सर्वसामान्यांना किरकोळ गोष्टींसाठी सुद्धा पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेऊनच व्यवहार करावा लागणार आहे. सर्वसाधारणपणे प्रतिज्ञापत्र, भाडे करार, विविध कर्ज प्रकरणासाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, शैक्षणिक कामांसाठी लागणारे प्रतिज्ञापत्रे, संचकारपत्र, विक्री करार अशी कामे शंभर रुपयांच्या स्टॅम्पवरती केली जात होती. मात्र आता त्याच कामासाठी चारशे रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. हक्क सोडपत्रसाठी दोनशे रुपयांचा स्टॅम्प वापरला जातो. आता त्यासाठी आता पाचशे रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीला दिले किती खिशातून जाणार किती असाच प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे.
दुसरीकडे, जीवनावस्यक वस्तू, औषधांच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे. त्यामुळे स्वयंपाक घरातील फोडणीला महागाईच्या झळा बसू लागल्याने लाडकी बहीण चांगलीच संकटात सापडली आहे. डाळ, तांदूळ, शेंगदाणे, कडधान्यासह मसाल्याच्या दर वाढले आहेत. त्यामुळे स्वयंपाक घराचे बजेट फोलमडले आहे. शासनाने एकीकडे ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करून महिलांना महिना पंधराशे देत दिलासा दिला. मात्र दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला गेले आहेत. त्यामुळे महिलांना महिन्याकाठी घर चालवण्यासाठी असलेले बजेट बाढल्याने लाडकी बहीण योजनेचे पैसेदेखील अपुरे पडू लागले आहेत.