Ramdas Athawale: देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की, तुम्हाला विधान परिषदेची जागा मिळेल. पण फडणवीस यांनी शब्द पाळला नाही, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीला निर्वाणीचा इशारा दिला आहे. रामदास आठवले किंवा आरपीआय (RPI) पक्षाला गृहीत धरु नका. विधान परिषदेत (Vidhan Parishad Election 2026) आम्हाला हक्काची जागा मिळायला हवी होती. तसेच आगामी महामंडळ वाटपात आरपीआय पक्षाला वाटा मिळाला पाहिजे, असे रामदास आठवले यांनी महायुतीला (Mahayuti) ठणकावून सांगितले आहे. रामदास आठवले यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन आपल्या या भावना व्यक्त केल्या आहेत. (Maharashtra Politics news) त्यानंतर आता आठवलेंनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, आरपीआय (RPI) हा महायुतीचा हा भाग आहे, २०१२ ला आरपीआय (RPI) शिवसेना भाजपसोबत बीएमसी निवडणुकीला सामोरे गेलो आणि महायुती प्रयोग झाला. आता BMC मध्ये एकही जागा मिळाली नाही त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की, तुम्हाला विधान परिषदेची जागा मिळेल. पण फडणवीस यांनी शब्द पाळला नाही, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
Ramdas Athawale : देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा….
आरपीआय (RPI) पक्षाला बाजूला ठेवण्याचं काम केलं जातं आहे. महाराष्ट्रामध्ये आमच्यावर अन्याय होतोय. आरपीआय (RPI)ला विचारलं जात नाही. महायुतीमध्ये आरपीआय (RPI) पक्ष आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतोय. शिवसेना राष्ट्रवादी त्यांच्यासोबत आहे भाजपमध्ये आधीच गर्दी आहे, त्यांना त्यांचा कार्यकर्ते सांभाळता येत नसेल तर मी काय करणार. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा आणि राज्यपाल नियुक्त आमदार मध्ये तरी RPI ला जागा द्यावी, अशी इच्छा रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.
Ramdas Athawale : केंद्रात मंत्रिपद दिलं मग महाराष्ट्रमध्ये अन्याय का होतोय??
आरपीआय (RPI) कार्यकर्ते नाराज आहेत ते म्हणतात, भाजपकडून आपल्या पक्षाला काहीच मिळत नाही. मी प्रयत्न करत असताना सुद्धा काहीच आम्हाला मिळत नाही, आम्हाला आरपीआय (RPI) वारंवार पक्षाला डावललं जातं आहे, हे बरोबर नाही, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मागितली आहे, त्यांना मी हे सगळं बोलणार नाही. एक विधान परिषद आणि एक दोन मंडळ पक्षाला द्यावी. अब्दुल सत्तार यांनी नाराज व्हायचे कारण नाही, कारण त्यांना ४ जागा मिळाल्या आहेत. माझे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. त्यांनी केंद्रात मंत्रिपद दिलं मग महाराष्ट्रमध्ये अन्याय का होतोय?? असा सवालही रामदास आठवलेंनी उपस्थित केला आहे.

Ramdas Athawale : एक्सपोस्ट करत नाराजी केली व्यक्त
रामदास आठवले यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये भाजपला जुन्या दिवसांची आठवण करुन दिली आहे. ज्या काळात भाजप-शिवसेनेसोबत इतर कोणतेही नेते आणि पक्ष येत नव्हते, त्या कठीण काळात आपला RPI पक्ष त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहिला. भाजप-शिवसेनेच्या युतीसोबत जेव्हा आपली RPI ची ताकद जोडली गेली, तेव्हाच खऱ्या अर्थाने या युतीची ‘महायुती’ झाली आहे. आज आपण गरीब आणि शोषित घटकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात यशस्वी झालो असून, आपला पक्ष देशभरात वेगाने वाढत आहे. भविष्यात आपल्या पक्षाला कोणीही गृहीत धरू नये आणि सत्तेत आपला हक्क व सन्मान अबाधित राहावा, यासाठी आता RPI च्या सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने व नव्या जोमाने मेहनत घेण्यास सुरुवात केली आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
आपला RPI पक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणारा पक्ष आहे. दिलेला शब्द पाळणे हा माझा स्वभाव असल्यामुळे, माझ्याकडून महायुतीत कधीही दगाफटका होणार नाही. ‘आठवले कुठेही जाणार नाहीत आणि ते दगा करत नाहीत’ पण याचा अर्थ आम्हाला कोणीही गृहीत धरावे असा नाही. विधान परिषदेत आम्हाला हक्काची जागा मिळायला हवी होती आणि आता महामंडळांच्या नियुक्त्यांमध्ये तरी आमच्या या प्रामाणिक निष्ठेचा व मैत्रीचा योग्य तो सन्मान राखला गेलाच पाहिजे, अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.













