Maratha Reservation Manoj Jarange Patil Hunger Strike : ‘कितीही जीवाची लाही लाही झाली तरी हरकरत नाही, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्या आयुष्याचा उन्हाळा झालाय, तर आपण आपली कदर का करायची’, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
मनोज जरांगे काय म्हणाले?
काही दिवसापूर्वी मनोज जरांगेंनी आमरण उपोषणाची घोषण केली होती. त्यानंतर, भाजपचे नेते प्रसाद लाड हे जरांगेंना भेटायला आले होते. पण त्यानंतरही सरकार दरबारी आरक्षणासाठी काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे हे अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या बोलण्यातून उद्वेग आणि संताप दिसत होता. त्यातूनच त्यांनी सरकारला इशारा दिला आहे की, ‘मी येत्या 30 तारखेला आमरण उपोषणाला बसणार आहे. देशात कुठेच असं झालं नसेल असं उपोषण होणार आहे. मागच्यावेळी उपोषण करताना मंडप टाकला होता. यावेळी मंडप टाकला जाणार नाही. मी सावलीत बसून उपोषण करणार नाही. असाच जाऊन बसणार आहे. मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात मी बसणार आहे. मेलो तर मेलो. कुणीही समाजबांधवांनी अंतरवलीकडे येऊ नका’, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

मोर्चे काढले तरीही आरक्षण नाही
‘मराठ्यांती मतं तुम्हाला हवीत, पण आरक्षण दिलं जात नाही. राज्यभरात मराठा तरुणांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उपोषणात मेलो तर मेलो तरी चालेल. बलिदान गेलेल्यांच्या कुटुंबीयांना सरकार अद्याप नोकरी देईना. मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करायला किती वेळ लागतो? तीन लाख कुणबी प्रमाणपत्र दिले म्हणता, उपकार केले का?’ असा संतप्त सवालही जरांगे पाटील यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, ‘मला आता आरपारची लढाई लढायची आहे. सगळ्या मागण्या सांगितल्या, सर्व समजून सांगितलं तरी आरक्षण नाही. प्रेमानं सांगितलं, मोर्चे काढले तरीही आरक्षण नाही. मराठ्यांची लेकरंबाळं अधिकारी झाली पाहिजेत’, असंही ते म्हणाले. ‘पश्चिम महाराष्ट्रात सधन, फळबागा आहेत म्हणता, ओबीसीकडेही आहेत. सधन आणि फळबागा हा काय आरक्षणाचा निकष आहे का?’, असं मनोज जरांने पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. आता त्यांच्या या आमरण उपोषणाला सरकार काय उत्तर देतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.















