घराची दक्षिणेकडील बाजूची आणि रस्त्यालगतची भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडण्याचे काम सुरू होते. याच वेळी रस्त्यावरून जात असलेल्या दोघींच्या अंगावर अचानक भिंतीचा मोठा भाग आणि मातीचा ढिगारा कोसळला.
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्याच्या आजरा शहरात आज (20 एप्रिल) एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. शहरातील ‘वाणी गल्ली’ परिसरात एका जुन्या घराची भिंत पाडण्याचे काम सुरू असताना, ही भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेत अन्य एक महिला गंभीर जखमी झाली आहे. वैष्णवी तुकाराम भोसले (इयत्ता 6 वी वय 14 वर्षे) आणि ज्योती नितीन कुंभार (प्राध्यापिका, वय 45 वर्षे) अशी दुर्दैवी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
नेमकी घटना काय घडली ?
मिळालेल्या माहितीनुसार, आजरा येथील वाणी गल्लीत डॉ. देशपांडे यांच्या मालकीचे एक जुने घर आहे. या घराची दक्षिणेकडील बाजूची आणि रस्त्यालगतची भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडण्याचे काम सुरू होते. याच वेळी रस्त्यावरून जात असलेल्या दोघींच्या अंगावर अचानक भिंतीचा मोठा भाग आणि मातीचा ढिगारा कोसळला. ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्याने दोघींचाही जागीच अंत झाला. दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या ललिता भोसले यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या गडहिंग्लज येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जुन्या घराचे पाडकाम सुरू असताना सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. एकाच वेळी प्राध्यापिका आणि विद्यार्थिनीचा असा दुर्दैवी अंत झाल्यामुळे संपूर्ण आजरा शहरावर शोककळा पसरली आहे.
















