स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन झाल्या आहेत. मुंबईतील शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज आणि प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.

Asha Bhosle Passes Away : ज्येष्ठ गायिका स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन झाल्या आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार आशिष शेलार, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री संजय शिरसाट, मुंबईच्या महापौर रितू तावडे, तसेच राजकीय, सामाजिक, सिनेजगतातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या. आशा भोसले आज आपल्यात नसल्या तरी त्यांनी गायलेल्या हजारो गाण्यांच्या रुपात त्या कायम आपल्यातच राहतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
शाककीय इतमामात अंत्यसंस्कार
आशा भोसले यांचे 12 एप्रिल रोजी दु:खद निधन झाले. हे वृत्त समोर येताच सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. आज शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी लोअर परळ येथील निवासस्थानी आशाताईंचे पार्थित अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर अंत्ययात्रेदरम्यान हजारो लोकांनी आशाताईंचे अखेरचे दर्शन घेतले. शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर राजकीय नेत्यांनी आशाताईंना पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या वर्षी अनेक जाहीर कार्यक्रमांना उपस्थिती
त्यांना अलौकिक स्वरांची देणगी लाभली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 12 हजारांपेक्षा जास्त गाणी गायली. मराठी, हिंदी, बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांत त्यांनी गाणी गायली. आशाताई गेल्या वर्षीच अनेक जाहीर कार्यक्रमांना उपस्थित होत्या. वयाची नव्वदी पार करूनही खणखणीत आणि मधूर आवाजाने त्यांनी अनेक कार्यक्रमांत गाणी गायली. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होत्या. शनिवारी संध्याकाळी 7 वाजता त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचाराला साथ न दिल्याने आशाताईंचे निधन झाले. आशाताई आता या जगात नसल्याने सीनेजगताचे तसेच महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी हानी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.










