एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेवर प्रश्नपत्रिका फुटीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अहिल्यानगरमधील ऋषिकेश गांगर्डे यांनी हा आरोप केला आहे.

नीट पेपरफुटी, टीईटी पेपरफुटी प्रकरण संपूर्ण देशासहित राज्यात गाजत असताना आणखी एक धक्कायक प्रकार समोर आला आहे. एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अहिल्यानगरचे ऋषिकेश गांगर्डे यांनी धक्कादायक हा दावा केला आहे. गांगर्डे यांच्या दाव्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या पेपरफुटीविरोधात संपूर्ण देशात आंदोलने झाली. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांनी जंतरमंतरवर ठाण मांडलं होतं. त्यानंतर प्रधान यांना केंद्रीय मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. तर काही आठवड्यापूर्वी ठाण्यात टीईटीचा पेपर देखील फुटल्याचं समोर आलं होतं. त्या प्रकरणातही बिहारमधून एकाला अटक करण्यात आली होती. या सर्व घटना ताज्या असताना अहिल्यामधील ऋषिकेश गांगर्डे यांनी एमपीएससी औषध निरीक्षक भरतीची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा केला आहे. त्यांनी परीक्षेच्या दोन दिवस आधीच काही उमेदवारांकडे प्रश्न-उत्तरे असल्याचा आरोप केला आहे. व्हॉट्सअॅपद्वारे संभाव्य उत्तरे पाठविल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी गांगर्डे यांनी केली आहे.

तक्रारदाराने नेमकं काय म्हटलं?
ऋषिकेश गांगर्डे यांनी आरोप करताना म्हटलं की, लोकसेवा आयोगाने 22 मार्च 2026 रोजी औषध निरीक्षक या पदासाठी क्लास 2 श्रेणीसाठी पेपर घेतले होते. या परीक्षेची प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हे दोन दिवस आधी म्हणजे 20 मार्च रोजी काही उमेदवारांकडे व्हॉट्सअॅपद्वारे आले होते. तर व्हॉट्सअॅप चॅटिंगमध्ये म्हटलं की, तुम्ही 78 ते 80 प्रश्न लिहा. तर उर्वरित 10 ते 12 प्रश्न चुकीचे लिहा. दोनशेपैकी ९० प्रश्न हे पर्यायासहित अचूक आले होते. या प्रकरणी पोलिसांत गेलो होतो, परंतु त्यांनी तक्रार घेतली नाही. त्याआधी आम्ही एमपीएससी आयोग आणि एडीएच्या मुख्य कार्यालयात जाऊन तक्रार दिली आहे. आता या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी. तसेच पेपरफुटीतील आरोपींना अटक करावी. हे संपूर्ण प्रकरण बाहेर काढावे’.













