Devendra Fadnavis: अजितदादा-शिंदेंबाबत फडणवीसांच्या धाडसी विधानाची चर्चा; दोन्हीपैकी एकही नेता संवाद साधण्यात चांगला नाही

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Mahayuti News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा होत आहे. एका मुलाखतीत बोलताना, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संवाद साधण्यात चांगले नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात प्रचंड बहुमताने महायुतीच्या सरकारने पुनरागमन केलं. भाजपला ऐतिहासिक यश मिळाल्याने मुख्यमंत्रि‍पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. या तीन नेत्यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये अधूनमधून वादाची ठिणगी पडत असते. मात्र आम्ही आपआपसात संवाद साधून हे मतभेद दूर करतो, असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात असतो. अशातच एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाडसी विधान केलं आहे. “अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांपैकी एकही नेता संवाद साधण्यात चांगला नाही,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘द इंडियन एक्स्प्रेस’ या दैनिकाने घेतलेल्या मुलाखतीदरम्यान ‘रॅपिड फायर राऊंड’मध्ये देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न विचारण्यात आले. “अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोण सर्वांत चांगल्या पद्धतीने संवाद ठेवतात?” असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “त्यांनी मला माफ करावं, पण दोघेही चांगले संवाद साधणारे नेते नाहीत.” मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या धाडसी विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत असून महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या माध्यमातून दिले नाहीत ना, अशी चर्चा रंगू लागली आहे.

अजित पवार की एकनाथ शिंदे? प्रश्नांची सरबत्ती अन् मुख्यमंत्र्यांची उत्तरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रॅपिड फायर राऊंडमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित इतरही काही प्रश्न विचारण्यात आले. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात नैसर्गिक आपत्तीचं व्यवस्थापन कोणता नेता चांगल्या पद्धतीने करतो? या प्रश्नावर ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांना नैसर्गिक आपत्तीत स्वत:ला झोकून देण्याची आवड आहे. त्यामुळे मी त्यांचं नाव घेईन.”

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवार की एकनाथ शिंदे, कोण वरचढ आहे? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी चलाखीने उत्तर देत ‘भाजप’ वरचढ असल्याचं म्हटलं. तर पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत कोणाचा दृष्टीकोन चांगला आहे? असं विचारलं असता आम्हाला तिघांनाही हे काम आवडतं, असं ते म्हणाले.

“दोघांपैकी एकाचाही सल्ला घेणार नाही”

तुमच्या पक्षश्रेष्ठींसोबत मतभेद झालं तर तुम्ही या दोघांपैकी कोणाचा सल्ला घ्याल? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावरही उत्तर देताना आपण अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांचा सल्ला घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कारण आमच्या पक्षनेतृत्वाला मी जास्त ओळखतो. त्यांना त्याबाबत फार माहिती नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा

IPL 2025 : क्वॉलिफायर 1 सामन्यात आरसीबीच्या प्लेइंग 11 मध्ये दोन बदल जवळपास निश्चित, काय ते जाणून घ्या

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon