राज्यातील महायुतीतील अंतर्गत कलहावर रोहित पवारांनी गंभीर भाष्य करत, भाजप आपल्याच मित्रपक्षांची शिकार करणार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण सुरु होणार असल्याची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना एकनाथ शिंदे गटातून पुन्हा ऑपरेशन टायगर राबवण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर आली होती. ठाकरे गटाचे ८ खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून, त्यांची गुप्त बैठक झाल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले होते. आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अत्यंत गंभीर आणि सूचक विधान केले आहे. यावेळी रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधत महायुतीतील मित्रपक्षांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
रोहित पवार यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर नुकतंच एक ट्वीट केले आहे. यावेळी त्यांनी सत्तेतल्या मित्रपक्षांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. भाजप सत्तेतले आपलेच मित्रपक्ष फोडणार आहेत, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
रोहित पवारांचे ट्वीट नेमकं काय?
भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे, पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे, असे रोहित पवार म्हणाले.
महाराष्ट्राला काळिमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही तर ठरवून आणलं गेलं असून ही फक्त सुरुवात आहे. आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी ‘ए दोस्ती हम नही छोडेंगे’ ची भावना दाखवत असले तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपाबाबत “जा बेवफा जा हमे…” याहून वेगळी असणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणंच उचित राहील, असाही सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या बातम्या चर्चेत होत्या. मात्र, खासदार श्रीकांत शिंदे यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत, तर ठाकरे गटाच्या खासदारांनीही आपण उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे. आता मात्र या विधानामुळे आगामी काळात महायुतीत मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय क्षेत्रात तर्कवितर्कांना उधाण आले असून, महायुतीमधील घटक पक्ष यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









