नागपूर , 12 फेब्रुवारी (हिं.स.)। टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी महांगडे हीने तिचे शेवटच काम आई कुठे काय करते मालिकेत केले.तिने या मालिकेत अनघाची भूमिका साकारली होती.अश्विनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना नेहमी अपडेट देत असते. दरम्यान, अश्विनी महांगडेने नागपूरमधील दीक्षाभूमीला भेट दिली आहे. तिने पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
अश्विनी महांगडे हिने फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, “दीक्षाभूमी” हे भारतीय बौद्ध धर्मीयांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. हे स्थळ महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात आहे. इथे बुद्ध धम्माचे स्थापक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या धम्म ची रचना केली. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या अनुयायांनाही नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती त्यामुळे या भूमीला ‘दीक्षाभूमी’ म्हटले गेले. काही कालावधीनंतर येथे एक भव्य स्तूप उभारला गेला. दीक्षाभूमीच्या या भव्य बौद्ध स्तूपाप्रमाणे आकारामुळे याला ‘धम्मचक्र स्तूप’ असेही म्हणले जाते.
आई कुठे काय करते मालिकेनंतर आता अश्विनी एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.ती आता एका नाटकात काम करते आहे. या नाटकाचं नाव आहे गडगर्जना. यात ती राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहे. गडगर्जना या नाटकाचे दिग्दर्शन वैभव अनंत महाडिक यांनी केले आहे. या नाटकात स्तवन शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता निखिल चव्हाण निवेदकाची भूमिका बजावत आहे. नरवीर तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत वैभव सातपुते झळकणार आहे.