सांगोला –
तीनपट पैसे मिळण्याच्या आमिषाला बळी पडून सांगोला तालुक्यातील गायगव्हाण येथील एका शेतकऱ्याची तब्बल ९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
फिर्यादी शांतीलाल साळुंखे (वय ४८) हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सुमारे महिनाभरापूर्वी त्यांच्या नात्यातील व्यक्तीमार्फत काही लोक पैसे गुंतवल्यास तिप्पट परतावा देतात, अशी माहिती त्यांना मिळाली होती. सुरुवातीला त्यांनी नकार दिला; मात्र कर्जबाजारीपणामुळे जमीन सोडवण्यासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी गुंतवणुकीचा निर्णय घेतला.
त्यासाठी त्यांनी मुलगी व तिच्या सासूचे दागिने गहाण ठेवून ९ लाख रुपये उभे केले. तसेच जावयाकडून ५० हजार रुपये ऑनलाइन घेतले आणि स्वतःचे ५० हजार मिळवून एकूण १० लाख रुपये जमा केले.

१४ एप्रिल २०२६ रोजी काही संशयित महुद येथे आले आणि रात्री साळुंखे यांच्या घरी जाऊन तिप्पट पैसे देण्याचे आश्वासन दिले. बोलण्यात गुंतवून त्यांनी हातचलाखीने पैशांची बॅग बदलून त्याऐवजी बॉक्स ठेवला. नंतर बॉक्स उघडून पाहिल्यावर त्यामध्ये ५०० रुपयांच्या नोटांच्या आकाराचे कोरे कागद आढळले.
यानंतर साळुंखे व त्यांच्या नातेवाईकांनी संशयितांचा शोध घेतला असता काही जण सापडले; मात्र इतर साथीदार पैसे घेऊन फरार झाले होते. पुढे संपर्क साधल्यानंतर संबंधितांनी १ लाख रुपये ऑनलाइन परत केले; परंतु उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ केली.
या प्रकरणी चंदू आर्शिद, रमेश दंडी, सज्जन पवार, निलेश सिद्धे, मनोज सोनवणे आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि वाघे करत आहेत.










