सांगोला :- उन्हाची तीव्रता जसजशी वाढत चालली आहे तसतसे माणसाच्या अंगाची लाही लाही होते आणि तहानेने जीव कासावीस होतो. मग अशा वेळी थंडगार सरबत किंवा पाणी पिऊन आपली तहान भागवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र प्राणी आणि पक्षांसाठी उन्हाचा तडाखा जीवघेणा ठरू लागला आहे.
वाढत्या उन्हामुळे जलशयातील पाणी अत्यंत वेगाने कमी होत असल्याने पक्षी आणि प्राणी यांच्यासाठी ते जीवघेणा ठरत आहे. माण नदी पाणी पातळी खालावत असल्याने छोटी छोटी डबकी तयार झाली असून जागोजागी पाणी साठलेले दिसत आहेत. याच डबक्यात मासे असल्याने पाणथळ जागी असणारे पक्षी जसे की चित्र बलाक, शेकाट्या, काळा शरती खाद्य मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. आणि प्रत्येक जण शेवटचा घास मिळवण्यासाठी धडपडत आहेत. कारण कोणत्याही क्षणी पाण्याबरोबर मासे संपुष्टात येतील याचा काही नेम नाही. याचा प्रत्यय सांगोला तालुक्यातील छोटे मोठे तलाव आणि माण नदी पात्रात पहावयास मिळत आहे.
शेकडो चित्रबलाक पक्षी अखेरचा घास मिळवण्यासाठी एकमेकावर धावून जाताना दिसतात आणि डबक्यात उरलेले मासे आपले तोंड पाण्याबाहेर काढून अखेरचा श्वास घेण्याचा प्रयत्न करत असताना या चित्रबलाक पक्ष्यांच्या भक्षस्थानी पडतात. असेच एक विदारक दृश्य सांगोला महाविद्यालयातील भूगोल विभागप्रमुख प्रा. संतोष कांबळे यांनी आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केले आहे. हे छायाचित्र परिस्थितीची जाणीव करून देत असून पक्षासाठी उन्हाळा काळ बनू पहात आहे.
नद्या नाल्यावरील बांध बंधारे उन्हाळ्याने आटत असताना दुसर्या बाजूला शेतीसाठी चोरून पाणी उपसा होत असताना दिसून येते. अशा चोरट्या पाणी उपसा बंद झाल्यास पाणथळावरील प्राणी व पक्षांना जगण्यासाठी मोठा उपयोग होईल व सांगोला तालुक्यातील पक्षी प्राणी जैवविधता अबाधित राहील असे मत सांगोला महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विषयाचे प्रा. डॉ. विधीन कांबळे यांनी मत व्यक्त केले.







