Satara Jilha Parishad: सदस्यांनी ‘गेटपास घेऊन आलो तरी मतदानाला जाऊ देईनात’ असा आरोप केला. त्यामुळे गेटवर पोलिसांशी वादावादी झाल्याचे दिसून आले.

Satara Jilha Parishad: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून (20 मार्च रोजी) झालेला वाद ताजा असतानाच आज (4 एप्रिल) सभापती निवडीतही तेच दिसून आले. अध्यक्षपदासाठी भाजपने केलेल्या दंडेलशाहीचा विरोध करत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य दंडावर काळी फित बांधून आले. भाजपने फोडाफोडीचा धंदा कायम ठेवला असून आणखी एक सदस्य फोडला आहे. त्यामुळे सभापती निवडीवर राष्ट्रवादी अन् शिवसेना बहिष्कार टाकणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपचे चार सभापती होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, सातारमधील राडा लक्षात घेत आज पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला असला, तरी सदस्यांनी ‘गेटपास घेऊन आलो तरी मतदानाला जाऊ देईनात’ असा आरोप केला. त्यामुळे गेटवर पोलिसांशी वादावादी झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे, अध्यक्ष निवडीत मंत्र्यांना झालेली धक्काबुक्की आणि पोलीस प्रशासनावरील आरोपांमुळे तो राज्यभर गाजला.
अध्यक्ष निवडीत काय घडलं?
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी 20 मार्च रोजी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. या निवडीवेळी जोरदार राडा झाला होता. भाजपने राष्ट्रवादीचे तीन आणि शिंदेसेनेचे दोन सदस्य फोडून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती. त्याचवेळी पोलिसांनी एका तक्रारीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना जिल्हा परिषदेतून बाहेर काढून नेले होते. त्यामुळे त्यांनाही मतदानाचा हक्क बजावता आला नव्हता. जिल्हा परिषदेत कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नव्हते. 65 पैकी भाजपकडे 27 जागा होत्या, तर बहुमतासाठी 33 ची गरज होती. राष्ट्रवादी (20) आणि शिवसेना-शिंदे गट (15) यांनी एकत्र येत भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीचे 3 आणि शिवसेनेचे 2 सदस्य भाजपने फोडले. एका अपक्ष सदस्याच्या पाठिंब्यासह भाजपने 33 मते मिळवून सत्ता काबीज केली.
मंत्र्यांना धक्काबुक्की आणि पोलिसांवर आरोप
निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रचंड राडा झाला. शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी असा आरोप केला की, त्यांच्या आघाडीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी जाणीवपूर्वक मतदानापासून रोखले. या गोंधळात मंत्र्यांना धक्काबुक्की झाल्याचेही समोर आले, ज्यामुळे ‘शिंदे गट’ विरुद्ध ‘भाजप’ असा संघर्ष महायुतीतच पाहायला मिळाला. या वादाचे पडसाद विधिमंडळातही उमटले. ज्यावेळी हा राडा झाला, त्यावेळचे CCTV फूटेज गायब असल्याचे समोर आले. “वायर तुटल्याने कॅमेरे बंद होते” असे प्रशासनाचे स्पष्टीकरण शंभुराज देसाई यांनी फेटाळून लावत संशय व्यक्त केला. या प्रकरणी सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाची मागणीही लावून धरण्यात आली होती. सभापती निलग गोऱ्हे यांनी पोलिस अधीक्षकांचे निलंबाने निर्देश दिले, पण नंतर मागे घेण्यात आले. आता सभापती निवडीसाठी अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या








