सांगोला:-उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पाण्याअभावी शेतकर्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. ऊस, मका, फळबागा तसेच जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनल्याने शेतकरी चिंतेत होते. या पार्श्वभूमीवर शेतकर्यांनी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे आपली व्यथा मांडली.
परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी संबंधित अधिकार्यांशी दूरध्वनीवर चर्चा करून गुरुवारी (दि. 2 एप्रिल) सांगोला येथे तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीस फलटणचे मुख्य अधिकारी मोरे साहेब, डेप्युटी इंजिनिअर धोत्रे, नवले तसेच लाभधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आमदार देशमुख यांनी राजेवाडी तलाव व निरा उजवा कालवा येथील पाणीसाठ्याची स्थिती जाणून घेतली. शेतकर्यांच्या अडचणी व जनावरांच्या चार्याची समस्या लक्षात घेऊन तात्काळ पाणी सोडण्याची मागणी त्यांनी अधिकार्यांकडे केली. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अधिकार्यांनी तत्काळ निर्णय घेत राजेवाडी तलावातून कालव्यात पाणी सोडण्याचे आदेश दिले.
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे त्वरित पाणी उपलब्ध झाल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त करत त्यांचे कौतुक केले तसेच अधिकार्यांचे आभार मानले.
या बैठकीस दीपक गोडसे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते मोहन आलदर, अॅड. विजय खरात, ज्येष्ठ नेते संजय (मामा) गोडसे, सांगोला औद्योगिक वसाहतीचे व्हाईस चेअरमन नितीन नरळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाची माहिती प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी दिली.








