29 राज्यांमधील मान्सूनची स्थिती; 11 राज्यांमध्ये धो-धो पाऊस; 48 तासांत कसं असेल वातावरण?

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

देशाच्या अनेक भागांत मान्सूनचं आगमन झालं आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, काश्मीर आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये पावसामुळे दिलासा मिळाला आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. संपूर्ण देशात मान्सूनची स्थिती काय आहे, ते जाणून घेऊयात..

मंगळवारी (24 जून) रात्री दिल्ली-एनसीआरमध्ये झालेल्या पावसामुळे तिथलं तापमान काही प्रमाणात कमी झालं असलं तरी आर्द्रतेत वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, दिल्ली 30 जूनपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवारी (25 जून) सकाळपासून वातावरण ढगाळ असल्याने हवेतील आर्द्रतेमुळे घामाच्या धारा वाहू लागल्या. आज (गुरुवार) दिल्लीत दिवसभर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान 28 अंश सेल्सिअस असू शकतं. सततच्या पावसामुळे भूजल पातळीत हळूहळू वाढ होत आहे. परंतु काही ठिकाणी रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे.

देशातील 29 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

आज (26 जून) देशातील 29 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही तासांत हिमाचल प्रदेशमध्ये सर्वांत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमालच प्रदेशातील धर्मशाळा याठिकाणी ढगफुटी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली. लुंगटा पॉवर प्रोजेक्टजवळ ढगफुटी झाल्याने जवळपास 20 कर्मचारी पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. तर यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. धर्मशाळा इथल्या मानुनी खाड परिसरात पाण्याच्या जोरदार प्रवाहात सुमारे 15 ते 20 कर्मचारी वाहून गेले. तर देशातील 11 राज्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, झारखंड, मध्यप्रदेश, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, केरळ, कर्नाटकातील किनारी भाग आणि मध्य महाराष्ट्र यांचा समावेश आहे,

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मान्सूनच्या आगमनाने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ज्यामध्ये भागलपूर, मुंगेर, खगरियासारखे भाग प्रमुख आहेत. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भात पेरणीसाठी हे हवामान वरदान ठरू शकतं. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात, सहारनपूर, मुरादाबाद, बिजनौर, बरेली इथं मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 5-6 दिवस हा पाऊस असाच सुरू राहिला तर खरीप पिकांच्या पेरणीत वाढ होईल, असं कृषी तज्ज्ञांचं मत आहे.

केदारनाथ, बद्रीनाथमधील पावसाची स्थिती

उत्तराखंडच्या पर्वतीय भागात पावसाचं रौद्र रुप पहायला मिळतंय. केदारनाथ, बद्रीनाथ आणि गंगोत्रीसारख्या तीर्थस्थळांवर मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. उत्तराखंड सरकारने प्रवासी मार्गांवर सुरक्षा दल तैनात केले आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांना आणि पर्यटकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा इशारा देण्यात आला आहे. एनडीआरएफ आणि एसटीआरएफ पथकं सक्रिय आहेत. हवामान खात्याने पुढील 48 तासांत या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

राजस्थानला दिलासा

राजस्थान, कोटा, बुंदी, बारान आणि झालावड जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. हवामान खात्याने 29 जूनपर्यंत बिकानेर आणि जोधपूरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरवर्षी पाण्याच्या तीव्र कमतरतेला तोंड देणाऱ्या या राज्यात यावेळी पाऊस सकारात्मक संकेत देत आहे. इथल्या जलाशयांमध्ये पाण्याची पातळी वाढत आहे.

काश्मीर खोऱ्यातील हवामान

बुधवारी झालेल्या पावसामुळे काश्मीर खोऱ्यातील हवामान आल्हाददायक झालं आहे. मंगळवारी रात्री श्रीनगरसारख्या शहरात जून महिन्यातील सर्वांत उष्ण तापमानाची नोंद झाली. परंतु बुधवारी झालेल्या पावसाने तापमान काहीशी घट झाली. हवामान खात्याच्या मते, शुक्रवारपर्यंत याठिकाणी हलका ते मध्यम पाऊस सुरू राहील आणि आकाश ढगाळ राहील. पर्यटनाच्या दृष्टीने काश्मीरमध्ये येणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. परंतु काही ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.

सूरतमध्ये पूरसदृश परिस्थिती, रेड अलर्ट जारी

गुजरातमधील सूरत शहरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पर्वत, सिमदा, पुन, लिंबायत आणि पालसारख्या भागात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोकांचं दैनंदिन जीवन ठप्प झालं आहे. दुकानं, घरं आणि रुग्णालयेही पाण्याखाली गेली आहेत. हवामान खात्याने पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. नागरिकांसाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक सक्रिय करण्यात आले आहेत.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon