सांगोला ( प्रतिनिधी )- राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. दीपकआबा साळुंखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याच बरोबर आपली उमेदवारीही जाहीर केली आहे.
सांगोला येथे जयनीला हॉटेल मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दीपकआबांनी हा निर्णय जाहीर करतानाच आपण कसल्याही परिस्थितीत विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.
दीपक आबा साळुंखे यावेळी म्हणाले की, बंधुंनो गेली ३० ते ३५ वर्षे मी राजकीय जीवनात सक्रिय आहे. देशाचे नेते शरदचंद्र पवार आणि राज्याचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण आजवर राजकीय भूमिका पार पाडली आहे. नेत्यांचा आणि पक्षाचा आदेश मानून आजवर आपण पक्षाने आणि नेत्याने देईल त्या उमेदवाराचा प्रामाणिक पणे प्रचार केला आणि त्यांना निवडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
गेली वर्षभर मी सांगोला तालुक्यात ग्रामीण भागात कार्यकर्त्यांच्या तसेच मुंबई पुण्यासह राज्याच्या बाहेरील कोलकत्ता हैद्राबाद आणि बेंगलोर मधील सांगोलकरांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या व्यथा वेदना जाणून घेतल्या. सर्वसामान्य नागरिकांची सुखदुःख जाणून घेत असताना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही कसल्याही परिस्थितीत लढायलाच पाहिजे असा आग्रह तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनता धरत आहे. माझ्यासाठी येणारी विधानसभेची निवडणूक सामान्य जनता आणि कार्यकत्यांनी हातात घेतली आहे त्यांनीच आता मी विधानसभेची निवडणूक लढवावी असा निर्धार केला आहे कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या प्रामाणिक भावनेचा आदर करून मी यंदाची विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवायची असा ठाम निश्चय केला आहे सध्या मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आहे माझा पक्ष सध्या महायुतीत असून महायुतीमधून मी सांगोला विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी केली होती परंतु, सांगोला विधानसभेची जागा विद्यमान आमदाराला मिळेल असे वरिष्ठ पातळीवरून सूतोवाच मिळाल्याने मी माझ्या सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा करून आज मंगळवार दि. १५ ऑक्टोबर रोजी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.