सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आतापर्यंत मतदानाचे चार टप्पे पूर्ण झाले असून पाचव्या टप्प्यासाठी येत्या सोमवारी मतदान होणार आहे. दरम्यान मुंबईच्या शिवाजी पार्क येथे काल महायुतीची जाहीर सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर दिसले.
यावर ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आपली प्रतिक्रिया दिली. शिवाजी पार्क येथे भाषणे करायला भाडोत्री माणसे घेऊन लोक उद्धव ठाकरे यांना संपवण्याची भाषा करीत आहेत. तसा प्रयत्न तर करून बघा, महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. तसेच भाजपाला ज्या मतदारसंघात पराभव दिसतोय, तिथे मतदानाआधीच नागरिकांच्या बोटाला शाई लावली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे, असा आरोप उद्धव यांनी केला.
ठाकरे पुढे म्हणाले की, ज्या मतदारसंघात कमी मतदान होऊ शकते, अशा मतदार संघात भाजपाचे लोक मतदानाआधीच नागरिकांच्या बोटाला शाई लावत आहेत. या प्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. नागरिकांना आवाहन करतो की, असा प्रकार कुठे दिसून आल्यास गप्प बसू नये.