सांगोला – तीव्र उन्हाळ्यामुळे वाढलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यासाठी महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टेंभू–म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत मान नदीमध्ये उन्हाळी आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले असून, त्यामुळे तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या संदर्भात काल झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले की, सांगोला तालुक्यातील क्रमांक ४ आणि ५ फाट्यामधूनही लवकरच उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार आहे. यासाठी पाणीउचल केंद्रांची कार्यक्षमता तपासणे, कालव्यांची दुरुस्ती, गळती रोखण्यासाठी उपाययोजना आणि पाणीवाहिन्यांची देखभाल या सर्व बाबींची पूर्तता अंतिम टप्प्यात आली आहे. प्रशासनाने पाणीपुरवठा अखंड आणि नियोजित पद्धतीने करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मान नदीत आवर्तन सोडल्याने नदीकाठच्या गावांतील विहिरी, बोअरवेल्स आणि इतर पाणीस्रोतांची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. परिणामी खरीपपूर्व शेतीकामांना गती मिळेल, तसेच जनावरांच्या पाण्याची टंचाई कमी होईल. विशेषतः दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. काही भागांत आधीच पाणीटंचाई तीव्र झाल्याने या आवर्तनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पाणीवाटपात कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने कडक सूचना दिल्या आहेत. पाण्याचे समतोल व पारदर्शक वितरण, शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवणे, तसेच अनधिकृत पाणीउचल थांबवणे यावर भर देण्यात येणार आहे. स्थानिक स्तरावर देखरेख यंत्रणा सक्रिय ठेवून पाणीवाटपाचे काटेकोर नियोजन करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचनासारख्या पाण्याची बचत करणाऱ्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
टेंभू–म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील सिंचनक्षेत्रात वाढ करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून, अशा उन्हाळी आवर्तनांमुळे या योजनेचा प्रत्यक्ष लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे. आगामी काळात पाण्याच्या साठ्याची स्थिती लक्षात घेऊन आणखी आवर्तनांचे नियोजन करण्याबाबतही सकारात्मक संकेत बैठकीत देण्यात आले.
या बैठकीत सांगोला तालुक्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सक्रिय सहभाग घेतला. तालुक्यातील पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी उन्हाळी आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत निर्णय घेतल्याबद्दल आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, स्थानिक पातळीवरही समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.
















