महाराष्ट्रातील हवामानाच्या चढ-उतारांमुळे नागरिक गोंधळले आहेत. आता हवामान विभागाने पुढील चार दिवसांत कमाल तापमान २-३ अंशांनी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भात उष्णतेची लाट अपेक्षित असून, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. कोकणात उष्ण व दमट हवामान कायम राहील. सविस्तर हवामान अंदाज जाणून घ्या.

हवामानातील चढ उतारांनी महाराष्ट्रातील नागिरक अगदी गोंधळून गेले आहेत. उन्हाळ्याचे दिवस म्हणून कूलर, एसी लावावा तर मध्येच पाऊस हजेरी लावतो, पावसाच्याधारी कोसळू लागल्यावर छत्र्यांची शोधाशोध करायला घ्यावी, तर क्षणात उन्हाचा खेळ सुरू होता. वातावरणातील या बदलांमुळे नागिरकांची त्रेधातिरपीट उडाली असून लोक हैराण झाले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढायला लागला असून घामाच्या धाराही वहात आहेत. त्यातच आता वातावरणाबद्दल, हवामानाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
पुढील चार दिवसांत कमाल तापमान वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्याच्या कमाल तापमानात पुढील चार दिवसांत 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेसदृश स्थितीनंतर बुधवारी बहुतांश भागात कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी घट झाली आहे.

कसं असेल हवामान ?
पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारपासून राज्यातील पावसाचा प्रभाव हळूहळू कमी होईल, असा अंदाज व्य़क्त करण्यात आला आहे. मुंबईसह कोकण प्रांतात उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिकांना उन्हाची काहिली सहन करावी लागत आहे. पण येत्या शनिवारपर्यंत मुंबई, पालघर, ठाणे, रायगड येथे हीच स्थिती कायम राहणार आहे. गुरुवारी व शुक्रवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे पावसाचा अंदाजही आहे.
कोकणात कमाल तापमान किती ?
दरम्यान, कोकण पट्ट्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद बुधवारी रत्नागिरी येथे 34.6 अंश सेल्सिअस नोंदली गेली. तर मुंबईतील हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात 33.9, तर कुलाबा केंद्रात 33.8अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शहरात गुरुवारी कमाल तापमान 35 अंश, तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज आहे
मेघगर्जना विजांसह पावसाची शक्यता
गेल्या काही दिवसांत उन्हाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र आता पुण्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना दोन दिवस पावसाच्या शक्यतेसह येलो अलर्ट देण्यात आला आहे. यंदा एप्रिल अखेर पुणे शहर आणि परिसरातील कमाल तापमान 40°c आसपास होते. मात्र गेल्या काही दिवसांत त्यात काही प्रमाणात घट होऊन दिलासा मिळाला रात्री थोडा गारवाही जाणवत आहे. त्यामुळे उकाड्याने त्रासलेले नागरिक थोडे सुखावले आहेत.

















