महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला असून राज्याचा एकूण निकाल ९२.०९% लागला आहे. १७९ विद्यार्थ्यांना १००% गुण मिळाले असून कोकण विभागाने बाजी मारली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल आज जाहीर केला आहे. यंदा दहावीच्या परीक्षेत एकूण १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाराष्ट्र राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. या निकालाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील एकूण १७९ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत.
कोणत्या शहरात किती विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्यातील एकूण ९ विभागीय मंडळांपैकी विभागावार निकालात कोकण विभागाने ९७.६२ टक्क्यांसह राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर (८८.४१ टक्के) विभागाचा लागला आहे.

मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. संभाजीनगरमध्ये २४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत.
| विभाग | १०० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी |
| छत्रपती संभाजीनगर | २४ |
| कोल्हापूर | १५ |
| पुणे | १२ |
| कोकण | ०७ |
| नाशिक | ०६ |
| मुंबई | ०५ |
| नागपूर | ०३ |
| अमरावती | ०३ |
दरम्यान दहावीच्या निकालाच्या घोषणेनंतर आता विद्यार्थ्यांचे लक्ष पुढील प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबद्दल शंका आहे किंवा गुण पडताळणी करायची आहे, त्यांच्यासाठी बोर्डाकडून लवकरच ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
बातमी अपडेट होत आहे.













