Sanjay Raut : उद्धव ठाकरेंनी ठरवलंय एक पाऊल पुढे टाकायचं, भूतकाळात जायचं नाही; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Sanjay Raut on Raj Thackeray and Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे भविष्याचा विचार करणारे आहेत. आम्हाला मराठी माणसाचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut on Raj Thackeray and Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी संदेश दिलाय की, आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे. आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे. तुम्ही कोणीही या संदर्भात वेगळी भूमिका मांडायची नाही. चार भिंतीमध्ये आपण बोलू शकतो. पण, हा नवीन प्रवाह सुरू होत आहे. तो प्रवाह गढूळ करण्याचं काम आम्ही आमच्याकडून कदापि करणार नाही, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.

संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचे राजकारण आणि राजकारणाची सूत्र हातात घेतली पाहिजे, ही आतापर्यंत लोक भावना आहे. महाराष्ट्राच्या मनात जे आहे ती भावना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही व्यक्त केली. दोघांनीही आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. जेव्हा दोन प्रमुख नेते अशा भूमिका मांडतात, तेव्हा त्या आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. काही लोकांना त्याविषयी वेदना होणार आहे.  कारण उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमचं शेतावर जावं लागेल. कारण महाराष्ट्र हा कायम ठाकरेंवर प्रेम करणारा महाराष्ट्र आहे.

आम्ही सकारात्मक दृष्टीने याकडे पाहतोय

महाराष्ट्राने सातत्याने बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर मनापासून प्रेम केलं आणि आजही करत आहे. पिढ्या बदलल्या, पण हे प्रेम काही कमी होत नाही. त्यामुळे अनेकांना भीती वाटत असेल. त्यातून त्यांची काही पोटातून मळमळ बाहेर पडत असेल. त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही सकारात्मक दृष्टीने याकडे पाहत आहोत. महाराष्ट्रात काही चांगलं घडावं. महाराष्ट्राने एकत्र येऊन हुकूमशाही विरुद्ध कायम लढे दिलेले आहेत. चले जाव आंदोलनाची ठिणगी या मुंबईत पडली. त्यामध्ये मराठी माणूस पुढे होता, असे संजय राऊत यांनी म्हटले.

उद्धव ठाकरेंनी ठरवलंय एक पाऊल पुढे टाकायचं

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीच या विषयावर बोलावं, असे तुम्ही म्हणतात. पण, दुसऱ्या काळातील नेते यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, आमच्या पक्षात अशा प्रकारचं कोणी काहीही वक्तव्य केलेलं नाही. आमच्या भावना फार स्वच्छ आहेत. याबाबतीत आमचं मन निर्मळ आहे. त्यामुळे आम्ही असे ठरवले आहे की, कोणी काहीही बोलू द्या, भूतकाळात वळायचं नाही, हा फॉर्म्युला आहे. उद्धव ठाकरेंनी ठरवलंय की, एक पाऊल पुढे टाकायचे आहे. एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालंय हे दुर्लक्ष करून पुढे जायचे आहे. मागे आम्ही काय बोललो? ते काय बोलले? त्यांनी काय टीका केली? त्यांनी काय भूमिका मांडली? हे विसरायला हवे याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात.

उत्तम राजकारण हे भूतकाळात न डोकवण्याचे असते

जेव्हा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी स्थापन केली, तेव्हा आम्ही एकमेकांवर टीका करत होतो. पण एकत्र यायचं ठरल्यावर आम्ही भूतकाळाकडे पाहिले नाही. आम्ही भविष्यकाळाचा विचार केला. 2014 साली भारतीय जनता पक्षाने आमच्याशी युती तोडली. दोघांनी एकमेकांविरुद्ध प्रचंड टीका केली. परत आम्ही एकत्र आलो, तेव्हा आम्ही भूतकाळात पाहिले नाही. आम्हाला एकत्र यायचे होते आणि आम्ही आलो. आम्ही निवडणूक लढलो. भूतकाळात डोकावलो नाही. उत्तम राजकारण हे भूतकाळात न डोकवण्याचे असते, असे संजय राऊत यांनी म्हटले.

प्रवाह गढूळ करण्याचं काम कदापि करणार नाही

संजय राऊत पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे सुद्धा भविष्याचा विचार करणारे आहेत, भूतकाळाचा नाही. आम्हाला महाराष्ट्राचे भविष्य घडवायचे आहे. आम्हाला मराठी माणसाचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे. हे दोन नेत्यांमध्ये ठरलेले आहे. उद्धव ठाकरेंनी संदेश दिलाय की, आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे. आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे. तुम्ही कोणीही या संदर्भात वेगळी भूमिका मांडायची नाही. चार भिंतीमध्ये आपण बोलू शकतो. पण, ज्यामुळे हा जो नवीन प्रवाह सुरू होत आहे तो प्रवाह गढूळ करण्याचं काम आम्ही आमच्याकडून कदापि करणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

आणखी वाचा 

Kesari 2 : ओपनिंग वीकेंडला ‘केसरी 2’ची छप्परफाड कमाई; 11 चित्रपटांना चारली धूळ

सुरक्षा दलाची मोठी कारवाई, ८ नक्षलवाद्यांच्या खात्मा, एक कोटींचे बक्षीस असलेला विवेक दास्ते ठार

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon