विधान परिषद निवडणुकीच्या इतर बऱ्यापैकी सर्वच जागांवर महायुतीत एकमत झालं आहे. मात्र, शिवसेनेला हवी असलेली अजून एक जागा भाजप सध्या तरी सोडण्यास तयार नाही, त्यामुळे घोडे अडले
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांवर विधानपरिषद निवडणूक (Election) होत असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच असाच सामना होणार असल्याचे दिसून येते. मात्र, सध्या जागावाटपावरुन महायुतीमध्येच सामना रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महायुतीच्या (Mahayuti) आज झालेल्या बैठकीतही अंतिम तोडगा निघाला नसून 1 जागेवर तिढा कायम आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने (Shivsena) या निवडणुकीत 7 जागांवर आपला ठाम दावा केला आहे. शिवसेनेने भाजपसमोर आधीच्या 5 आणि नव्याने ताकद वाढलेल्या 2 अशा एकूण 7 जागांचा अधिकृत प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. भाजपने शिवसेनाला केवळ 3 ते 4 जागा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, आता केवळ एका जागेवरुन घोडं अडलं असल्याचे समजते.
विधान परिषद निवडणुकीच्या इतर बऱ्यापैकी सर्वच जागांवर महायुतीत एकमत झालं आहे. मात्र, शिवसेनेला हवी असलेली अजून एक जागा भाजप सध्या तरी सोडण्यास तयार नाही, त्यामुळे घोडे अडले. त्याच, पार्श्वभूमीवर आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर, लागलीच सुनील तटकरे यांनी देखील एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. या भेटींमध्ये जवळपास सर्वच जागांवर एकमत झालं आहे. पण शिवसेनेकडून अजून एका जागेची मागणी केल्याचे समजते. आता, यावर अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या बैठकीतच अंतिम तोडगा निघणार आहे.

महायुतीमध्ये सुरुवातीला जो प्राथमिक फॉर्म्युला ठरत होता, त्यानुसार भाजप 12 जागा, शिवसेना 3 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार असल्याची चर्चा होती. महायुती म्हणून एकत्र लढण्यावर तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झालं असलं, तरी काही पारंपरिक जागांची अदलाबदल केली जाणार असल्याचं कळत आहे. त्यातच, रायगड जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेकडूनही उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू आहे. यासोबतच,
ठाण्यातील जागेवर भाजपचा दावा
ठाणे विधान परिषद जागेवर भाजपने दावा केला असून नगरसेवकांचे संख्याबळ जास्त असल्याने ही जागा भाजपलाच मिळावी, अशी मागणी भाजपा आमदार संजय केळकरयांनी केली आहे. ठाण्यात भाजपचे 444 नगरसेवक असून शिवसेना व जिजाऊ संस्थेची संख्या 346 असल्याचा दावा त्यांनी केला आहे. महायुतीच्या चर्चेत भाजपची भूमिका मजबूत असून ठाणे विधानपरिषदेसाठी ठाणे जिल्ह्यातीलच चेहरा उमेदवार असेल, असेही केळकर यांनी सांगितले.














