पेट्रोल, डिझेलची बचत करा, परदेश दौरे करू नका असं आवाहन दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलं होतं. आता त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे सध्या मध्य पूर्वेत मोठा तणाव पहायला मिळत आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे संपूर्ण जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज कधी सुरू होणार? याबाबत अजूनही अनिश्चिता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी देशाला उद्देशून मोठं आवाहन केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी इंधनाची बचत करा, पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करा. जास्तीत जास्त इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर करा. सोने कमी खरेदी करा, परदेश वाऱ्या टाळा असं आवाहान त्यांनी केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहानानंतर आता शिवसेना नेते आणि मंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे.
मंत्र्यांचे सर्व परदेश दौरे रद्द करण्यात आले आहेत. तसेच मर्यादित ताफा वापरण्याचा निर्णय शिवसेना मंत्र्यांनी घेतला आहे. अनेक मंत्र्यांनी आता इलेक्ट्रिक कार वापरण्यास सुरुवात देखील केली आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील इलेक्ट्रिक कार वापरत असल्याची माहिती यावेळी उदय सामंत यांनी दिली आहे.

नेमकं काय म्हणाले उदय सामंत?
ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. कारण पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देशाला केलेले जे आवाहान आहे, त्यामध्ये इलेक्ट्रिकल व्हेकल असू दे किंवा ताफा कमी करण्याचं आवाहन असू दे, आम्ही त्याची अमंलबजावणी करत आहोत. स्वत: शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी याची सुरुवात केली आहे. मी देखील आता मुंबई परिसरात इव्ही गाडी वापरत आहे. ताफा देखील कमी करण्यात आला आहे, सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून आवश्यक आहे, तेवढाच ताफा ठेवण्यात आला आहे.
सगळे परदेश दौरे देखील रद्द झाले आहेत. शेवटी सांगून एखादा निर्णय घेण्यापेक्षा जे आवाहान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं, त्या आवाहानाला प्रतिसाद म्हणून अनेक मंत्र्यांनी आपले परदेश दौरे रद्द केले आहेत. शंभूराज देसाई असतील, आशिष शेलार असतील यांनी आपले परदेश दौरे रद्द केले आहेत. सरकार म्हणून आमची जी जबादारी आहे, ती आम्ही पार पाडू असं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे.













