Devendra Fadnavis on Loan Waiver: 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करण्यात आल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Devendra Fadnavis on Loan Waiver: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची (Loan Waiver) महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार सरकार कर्जमाफी योजना राबवणार आहे. त्यासाठी स्वतंत्र समितीही स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करण्यात येत आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी दिली जाणार आहे. याशिवाय, जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक लाभ देण्याची घोषणाही त्यांनी केली. या घोषणेनंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. महाविकास आघाडीने ही कर्जमाफी अपुरी असून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असल्याचा आरोप केला आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? याबाबत निकष सांगितले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा मी केली आहे. काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणी म्हणतं राष्ट्रीयकृत बँकेचं होणार नाही, जिल्हा बँकेची होणार नाही, कोणी म्हणतं सोसायटीची कर्जमाफी होणार नाही. आम्ही दोन लाखापर्यंत कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे असे कोणीही दिलेलं पीक कर्ज आम्ही माफ करणार आहोत, असे त्यांनी म्हटले.

30 जूनच्या आधी आम्ही कर्जमाफी करणार
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आमचा प्रयत्न आहे हा आहे की, कर्जमाफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही. शेतकऱ्याला फायदा होण्यासाठी आम्ही यावर काम करत आहोत. 30 जूनच्या आधी आम्ही कर्जमाफी करणार आहोत. आता समिती या सगळ्यावर काम करत आहे. जुन्या कुठल्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असेल, असे देखील त्यांनी सांगितले.
Loan Waiver : कोणते शेतकरी पात्र ठरणार?
– दोन लाख रुपयांपर्यंतची थकबाकी असलेले शेतकरी.
– ज्यांचं पीककर्ज थकलेलं आहे असे शेतकरीच पात्र असतील.
– 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्ज माफ होणार.
– नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ.









