महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक भागांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वीज धक्का, पाण्यात वाहून जाणे आणि बुडून अशा विविध घटनांमध्ये १० जणांना जीव गमवावा लागला. साताऱ्यात वीज धक्क्याने ४, तर गोंदिया, पनवेलमध्ये पाण्यात वाहून गेल्याने आणि जळगाव, भंडाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याने सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

राज्यातील पावसाचा जोर कायम असून मुसळधार पावसाने अनेक भागांना झोडपून काढलं आहे. पावसामुळे पाणी साचणं, झाडं पडणं अशा घटनाही कायम असून विविध दुर्घटनांमध्ये 10 जणांना जीव गमवावा लागला आहे. साताऱ्यातील फलटण तालुक्यातील खामगावमध्ये विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला. तर गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील आसोली गावालगतच्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकीसह प्रवाहात वाहून गेलेल्या व्यक्तीचा जीव गेला. दुसरीकडे नवीन पनवेल येथे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या विचुंबे येथील एका व्यक्तीचाही मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. दुर्दैवी घटना जळगावच्या अमळनेरमध्येही घडली असून तिथे खदाणीत बुडून तीन बालकांचा मृत्यू झाला. तर भंडाऱ्यात खेळता खेळता दीड वर्षाच्या बालकाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला. 10 जणांच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला असून खळबळ माजली आहे.
साताऱ्यात शॉ़क लागू एकाच कुटुंबातील 4 जण दगावले
साताऱ्याती फलटण तालुक्यात खामगाव मध्ये विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. घरासमोरील विद्युत केबलच्या तारेला स्पर्श झाला. एकमेकांना वाचवण्याच्या नादात चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये दोन महिला दोन पुरुषांचा समावेश आहे. किसन शिंदे, सचिन शिंदे, गंगुबाई शिंदे आणि आरती शिंदे अशी मृतांची नावे असून फलटण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास सुरू आहे.
गोंदियातील आसोलीजवळील पुलावरून पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह दोन दिवसांनी सापडला
आमगाव तालुक्यातील आसोली गावालगतच्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकीसह प्रवाहात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह दोन दिवसांच्या अथक शोधानंतर आढळून आला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पुलावर तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.5 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान आसोली गावाजवळील नाल्यावरील पुलावरून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत होते. त्याचवेळी जांभुरटोला येथील रूपचंद प्रेमिलाल बोपचे (वय अंदाजे 43 वर्षे) हे शेतीच्या कामानिमित्त दुचाकीने जात असताना पुलावर वाहनाचा तोल जाऊन ते दुचाकीसह पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस प्रशासन व संबंधित यंत्रणांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र नाल्यातील पाण्याचा वेग प्रचंड असल्याने त्यांचा तत्काळ शोध लागला नाही. अखेर सोमवारी (7 जुलै) परिसरातील काही नागरिकांना नाल्यात एक मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ गावातील नागरिक, मृतकाच्या नातेवाईक तसेच पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी आमगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

पनवेलमध्ये धरणाच्या पाण्यात सापडला नयन म्हात्रेचा मृतदेह
5 जुलै रोजी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या विचुंबे येथील नयन म्हात्रेचा मृतदेह गाढेश्वर धरणाच्या पाण्यात 7 जुलै रोजी सकाळी सापडून आला. अग्निशामक दलाने पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे नेलं. पाच जुलै रोजी विचुंबे येथील नयन म्हात्रे, सुमित पवार, रत्नेश तुपे यांच्यासह अकरा जण वाघाची वाडी जवळील परिसरात फिरायला गेले होते. यावेळी सुमित पवार आणि नयन म्हात्रे हे पोहण्यासाठी पाण्यात गेले. यावेळी सुमित पवार याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नयन म्हात्रे पाण्याचा प्रवाहात वाहून गेला होता. पाच आणि सहा जुलै रोजी पनवेल तालुका पोलीस, शोध आणि बचाव पथक, एनडीआरएफ यांच्यामार्फत शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र नयन म्हात्रे सापडून आला नाही. त्यानंतर सात जुलै रोजी टावरवाडी येथील नागरिकांना गाढेश्वर धरणाच्या परिसरात मृतदेह दिसून आला. याची माहिती तालुका पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दल पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने नयन म्हात्रेचा मृतदेह धरणाच्या परिसरातून बाहेर काढण्यात आला आणि पुढील कार्यवाहीसाठी उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे नेण्यात आले.
जळगावच्या अमळनेरात खदाणीत बुडून तीन मुलांचा मृत्यू
जळगावच्या अमळनेरात खदाणीत बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला. सेल्फी काढताना एक घसरला, त्याला वाचवताना इतर दोघेही बुडाले अशी माहिती समोर आली आहे. मानव बंटी रतनानी( वय १४) ,कार्तिक विकी उधवानी (वय १४) व दिनेश विजय पंजवानी (वय १७) अशी तिन्ही मृतांची नावे आहेत. पावसामुळे खदानीत मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याची माहिती समोर आली आहे. एका वेळी 3 निरागस मुलांचा मृत्यू झाल्याने सिंधी कॉलनीसह संपूर्ण अमळनेरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे
भंडाऱ्यात खेळता खेळता दीड वर्षाच्या बालकाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू!
भंडारा जिल्ह्याच्या एक लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहळी येथे खेळता खेळता दीड वर्षाच्या निष्पाप बालकाचा पाण्याच्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विहान विकास पोहनकर असं या मृत बालकाचं नाव आहे. विहान घराच्या अंगणात खेळत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो सिमेंटच्या पाण्याच्या टाकीत पडला. पाण्यात बुडाल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लाखांदूर पोलिसांनी या प्रकरणी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.












