Uddhav Thackeray Shiv Sena Crisis Solapur News : या मोठ्या बंडाच्या वृत्तामुळे राज्यभरात शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते कमालीचे संतप्त झाले आहेत. सोलापुरात याचे तीव्र पडसाद उमटले.

Operation Tiger UBT Solapur : महाराष्ट्र राजकीय भूकंपाने पुन्हा एकदा हादरला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, पक्षातील तब्बल 6 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. या 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा केला जात आहे. ओमराजे यांचे नाव या बंडखोर खासदारांच्या यादीत आघाडीवर आहे. त्यांच्या सोबतीला खासदार संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर हेदेखील शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. हे सर्वजण शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार असून, शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर याची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
सोलापुरात शिवसैनिक आक्रमक, केला दशक्रिया विधी (Uddhav Thackeray shiv sena aggressive in Solapur)
या मोठ्या बंडाच्या वृत्तामुळे राज्यभरात शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते कमालीचे संतप्त झाले आहेत. सोलापुरात याचे तीव्र पडसाद उमटले. पक्षाशी प्रतारणा करणाऱ्या या सहा खासदारांच्या विरोधात सोलापूरचे शिवसैनिक रस्त्यावर उतरले. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसरातील गणपती घाट येथे शिवसैनिकांनी एकत्र येत या खासदारांचा तीव्र निषेध केला. या वेळी संतापलेल्या शिवसैनिकांनी या सहा खासदारांच्या विरोधात थेट प्रतीकात्मक दशक्रिया विधी घालत जोरदार घोषणाबाजी केली.

“नरकातही जागा मिळणार नाही!….”
या आंदोलनादरम्यान ठाकरे गटाचे नेते आणि आमदारांनी बंडखोरांवर तिखट शब्दांत प्रहार केला. आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात खासदारांना शाप देण्यात आले. “स्वर्गात तरी सुखी राहा, तिकडे तरी गद्दारी करू नको, भाऊसाहेब वाकचौरे!”, “ए संजय जाधव, तुला नरकातही जागा मिळणार नाही!” आणि “ओमराजे निंबाळकर, अरं तुला कसं ओमराजे म्हणावं रे… तुझ्या अंगात…” अशा संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांकडून देण्यात आल्या.
कितीही गद्दार गेले तरी फरक पडणार नाही – जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण
दरम्यान, आंदोलनापूर्वी शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात ठाकरे गटाच्या वतीने महाआरती करण्यात आली. या वेळी बोलताना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी पक्षाची भूमिका मांडली. ते म्हणाले, “गेल्या 60 वर्षांपासून शिवसेना महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांसाठी आणि हक्कांसाठी अविरत काम करत आहे. शिवसेनेची पाळेमुळे घट्ट आहेत. कितीही गद्दार पक्ष सोडून गेले, तरी पक्षाला काहीही फरक पडणार नाही. निष्ठावंत शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभा आहे.”













