Maharashtra Vidhan Parishad Election: सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतली धुसफूस निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. शिवसेनेच्या भूमिकेवरच राष्ट्रवादीची दिशा अवलंबून असणार आहे.

मुंबई : सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीच्या (Satara Sangli Vidhan Parishad Election) निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकीयवर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महायुतीतील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली असून, मंगळवारी शिवसेना आपल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची म्हणजेच नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींची महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहे. या बैठकीत शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
या बैठकीत सर्व लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे सोपवला जाईल. त्यानंतर महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा अंतिम निर्णय मुंबईत वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे. दरम्यान, मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपवरच जाहीर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे महायुतीमधील अंतर्गत नाराजी उघड झाली आहे.
सातारा-सांगली विधानपरिषदेत भाजपने धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून अभयसिंह जगताप हे उमेदवार आहेत. या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे.

Satara Sangli Vidhan Parishad : भाजप अलर्ट मोडवर, मतदार अज्ञातस्थळी
महायुतीमधील अंतर्गत मतभेद आणि संभाव्य मतफुटीची भीती लक्षात घेता भाजप कमालीची सतर्क झाली आहे. सातारा आणि सांगलीतील भाजप समर्थक मतदारांना तातडीने अज्ञातस्थळी सुट्टीवर पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे, शिवसेना आणि राष्ट्रवादीने अद्याप आपली अधिकृत भूमिका स्पष्ट न केल्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे डोळे लागले असून, या अंतर्गत नाराजीचा फायदा थेट विरोधी उमेदवारांना होणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे.
Makarand Patil NCP Meeting : मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे सर्व अधिकार
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी खलबतं सुरू आहेत. मंत्री मकरंद पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादीच्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक प्रतिनिधींनी आपल्या भावना मांडत पुढील राजकीय भूमिकेचा संपूर्ण अधिकार मकरंद पाटील यांच्याकडे सोपवला आहे.
कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठीच कराड येथील महायुतीच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याचं मकरंद पाटील यांनी स्पष्ट केलं. तसेच, अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल, असे त्यांनी सांगितलं.















