HSC Marksheet :महाराष्ट्र बोर्डाकडून बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं 2 मे रोजी जाहीर करण्यात आला होता. विद्यार्थ्यांचं लक्ष त्यानंतर प्रत्यक्ष गुणपत्रक कधी मिळणार याकडे लागलं होतं.

Maharashtra HSC Marksheet Update पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून यंदा बारावीच्या परीक्षेचा निकाल 2 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला होता. महाराष्ट्राचा बारावीचा निकाल 89.79 टक्के लागला होता. बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यावेळी निकाल ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करुन देण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बारावीचे गुणपत्रक तथा प्रमाणपत्र कधी मिळणार यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेचे गुणपत्रक येत्या सोमवारी म्हणजेच 25 मे रोजी दुपारी 3.00 वाजल्यानंतर मिळेल, अशी माहिती परीक्षा मंडळाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार 02 मे 2026 रोजी ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला होता.
विद्यार्थ्यांना बारावीचे गुणपत्रक कधी मिळणार?
बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2026 च्या परीक्षेचे गुणपत्रक तथा प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र व तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप संबंधित विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना 25 मे रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. याच दिवशी उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत दुपारी 3.00 वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रक तथा प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. याबाबत विभागीय मंडळांमार्फत सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा राज्याचा निकाल 89.79 टक्के लागला आहे. तर, यंदा देखील मुलींनी या परीक्षेत बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 93.15 इतकी असून मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 86.80 टक्के इतकी आहे.
हेदेखील वाचा
वादळी वाऱ्यांसह मुसळधार… मान्सूनपूर्वचा कहर, या जिल्ह्यांना पावसाने झोडपलं; नागरिकांची उडाली तारांबळ














