Emergency Alert on phone: सार्वजनिक ठिकाणी एकाचवेळी अनेकांचे मोबाईल फोन वाजू लागले. यामुळे सुरुवातीला अनेकजण घाबरले, नेमके काय झाले, हे अनेकांना कळाले नाही.

Emergency Alert on phone: देशभरातील अँड्राईड आणि IOS स्मार्टफोनधारकांना शनिवारी एक वेगळाच अनुभव आला. शनिवारी सकाळी अचानक अनेक मोबाईल फोनवर (Mobile Phone) आपातकालीन मेसेज आले. हे सर्व मेसेज एकाचवेळी सर्व मोबाईल आणि स्मार्टफोन आले. हा संदेश फोनवर आला तेव्हा फोनची रिंगटोन जोरात वाजत होती. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी एकाचवेळी अनेकांचे मोबाईल फोन वाजू लागले. यामुळे सुरुवातीला अनेकजण घाबरले, नेमके काय झाले, हे अनेकांना कळाले नाही. मात्र, काहीवेळानंतर हा आपतकालीन मेसेज (Emergency Alert) असल्याचे स्पष्ट झाले. भारताने आपल्या नागरिकांसाठी तात्काळ आपत्ती सूचना सेवेकरिता, स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करुन सेल ब्रॉडकास्ट सुरु केले आहे. नागरिकांना सतर्क करा, राष्ट्राला सुरक्षित ठेवा. हा संदेश मिळाल्यावर जनतेकडून कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही, हा एक चाचणी संदेश आहे, असे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम म्हणजे काय? (Cell Broadcast Alert System?)
ही एक हायटेक आपत्कालीन चेतावणी प्रणाली आहे. याच्या माध्यमातून सरकार कोणत्याही आपत्ती किंवा धोक्याच्या परिस्थितीत थेट मोबाईल फोनवर अलर्ट पाठवू शकते. याचा वापर भूकंप, सुनामी, वीज कोसळणे, पूर, गॅस लीक, रासायनिक धोके तसेच इतर मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थितींमध्ये केला जाऊ शकतो.
हे सिस्टम कसे काम करते?
ज्या वापरकर्त्यांच्या फोनवर हा मेसेज येईल, त्यांच्या मोबाईलवर जोरात सायरनसारखा आवाज येईल आणि स्क्रीनवर फ्लॅश मेसेज दिसेल. वापरकर्त्यांना तत्काळ चेतावणी मिळेल. ही प्रणाली विशेषतः प्रभावित भागातील लोकांपर्यंत तात्काळ माहिती पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
‘SACHET’ सिस्टमद्वारे अलर्ट पाठवले जातील
सरकारच्या माहितीनुसार हे अलर्ट स्वदेशी Integrated Alert System ‘SACHET’ च्या माध्यमातून पाठवले जातील. हे सिस्टम C-DOT (Centre for Development of Telematics) ने विकसित केले आहे. हे कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल (CAP) वर आधारित असून, याची शिफारस इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन युनियन (ITU) ने केली आहे.
मग टेस्ट अलर्ट का पाठवले जात आहेत?
सरकार देशभरातील मोबाईल नेटवर्क आणि अलर्ट सिस्टमची विश्वसनीयता तपासू इच्छित आहे, जेणेकरून प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी अलर्ट वेगाने आणि अचूकपणे लोकांपर्यंत पोहोचू शकतील. NDMA ने स्पष्ट केले आहे की हे संदेश केवळ चाचणीचा भाग आहेत आणि नागरिकांनी कोणतीही कारवाई करण्याची गरज नाही.
इमर्जन्सी अलर्ट ऑन किंवा ऑफ कसे करावे?
जर तुम्ही अँड्रॉइड वापरकर्ते असाल, तर पुढील स्टेप्स फॉलो करा:
सर्वप्रथम सेटिंग्समध्ये जा
त्यानंतर ‘Safety & Emergency’ मध्ये जा
‘Wireless Emergency Alerts’ मध्ये जाऊन ‘Test Alerts’ ऑन किंवा ऑफ करा
मात्र, सरकारने स्पष्ट केले आहे की भविष्यात प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी सर्व मोबाईल फोनवर विविध भारतीय भाषांमध्ये अलर्ट पाठवले जातील.
फक्त SMS नाही, डिजिटल सुरक्षेकडे मोठे पाऊल
सरकारचा हा उपक्रम केवळ मेसेज पाठवण्यापुरता मर्यादित नसून, भारताच्या डिजिटल आपत्ती व्यवस्थापन नेटवर्कला अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.















