Palghar HRSP Number Plate registration : एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांवर अत्याधुनिक उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी लावण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले आहेत.
वसई : वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी परिवहन विभागाने तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही पालघर जिल्ह्यातील वाहनधारकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. पालघर जिल्ह्यात २०१९ पूर्वीची चार लाख ७८ हजार ९३१ वाहने असून, ऑक्टोबर अखेरीस त्यापैकी केवळ एक लाख ६४ हजार ५८२ वाहनधारकांनी आपल्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लाऊन घेतलेल्या आहेत. त्यामुळे अजूनही तीन लाखांच्या घरात वाहनचालकांनी याकडे पाठ फिरवली असून, पुन्हा एकदा या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे.
परिवहन विभागाचे आदेश
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाट्या या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आल्या आहेत. वाहनांचा अपघात झाल्यास वाहन मालकाची सर्व माहिती मिळणे, वाहनांची चोरी आणि गैरवापर टाळणे यासाठी एप्रिल २०१९ नंतरच्या सर्व दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना अत्याधुनिक उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक लाऊन घेण्याचे आदेश परिवहन विभागाकडून देण्यात आले आहेत. एप्रिल २०१९ नंतर नवीन वाहन खरेदी केल्यास वाहन वितरकाकडूनच या नंबर प्लेट उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना अशा प्रकारची नंबर प्लेट लावण्याची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे वाहनांची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांवर अत्याधुनिक उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी लावण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले आहेत.
        
संबंधित बातम्या
                        
                        
                        
                        
                        
				
															


