टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

आभाळाने सर्वच गिळलं… वीज पडून चौघांचा मृत्यू, जनावरेही दगावली; ऐन उन्हाळ्यात मोठं संकट

Follow Us:

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वीज कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. जालना, सातारा, अहमदनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो जनावरे दगावली. गहू, कांदा, आंबा पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. यामुळे अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आभाळाने सर्वच गिळलं... वीज पडून चौघांचा मृत्यू, जनावरेही दगावली; ऐन उन्हाळ्यात मोठं संकट

 

राज्यातल्या वातावरणात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होत असून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटकाही बसला आहे. काल महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा, पाऊस यासह गारपीटही झाली. त्याचा परिणाम शेतीवर, पिकांवर तर झाला आहेच पण माणसांनाही त्यांची झळ पोहोचली आहे. जालना, सातारा, राहाता / अहिल्यानगर, नांदेड या ठिकाणी पावसाने झोडपून कर काढलचं, पण वीज पडून काही ठिकाणी जनावरं दगावली. तसेच आत्तापर्यंत एकूण 4 जण दगावले आहेत. काही ठिकाणी शेळ्या, तर अहिल्यानगरमध्ये एका शेतकऱ्याच्या 9 गाईंचा दुर्दैवी मृत्यू झाला. पावसामुळे शेती पिकाचं नुसकान तर झालंच पण गुर ढोरं आणि घरातील माणसंही दगावल्याने अनेकांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा, शेतकऱ्याचा मृत्यू , श्वानही दगावला

खरवंडी, येळी, बडेवाडी, बोंदरवाडी, पिंपळगव्हाण, जांभळी परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.विशेषतः बडेवाडी शिवारात गारांचा वर्षाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गारपिटीमुळे गहू, कांदा, हरभरा, मका तसेच आंबा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ हा पाऊस सुरू होता. दरम्यान मालेवाडी येथे शेतात काम करत असताना वीज कोसळून शेतकरी शिवाजी खेडकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

ही घटना काल संध्याकाळी 6 च्या सुमारास घडली. दुर्दैवी घटनेत शेतकऱ्यासह त्यांच्या पाळीव कुत्र्याचाही मृत्यू झाला आहे. खेडकर हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत होते. मात्र अचानक वादळी वातावरण निर्माण होऊन वीज कोसळली. यात ते गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी पडले. त्यांच्यासोबत असलेला पाळीव कुत्राही या घटनेत मृत झाला. शेतातील जनावरे घरी परतली, मात्र खेडकर हे बराच वेळ झाला तरी घरी न आल्याने नातेवाईकांना संशय आला. त्यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता खेडकर मृत अवस्थेत आढळून आले. तर खरवंडी येथे लागूनच असलेल्या बीड जिल्ह्यातील टेंभुर्णी गावात वीज कोसळून एका बैलाचा मृत्यू झाला.

जालना – अवकाळी पावसात वीज कोसळून दोन तरुण जागीच ठार तर एक गंभीर जखमी

अंबड तालुक्यातील महाकाळा येथील तरुण अवकाळी पावसात लिंबाच्या झाडाखाली थांबले असता लिंबाच्या झाडावर वीज कोसळून दोन तरुण ठार एक जण गंभीर भाजला आहे. ही घटना महाकाळा ते साष्ट पिंपळगाव रोडवरील नाथनगर वस्ती या ठिकाणी घडली.या दुर्दैवी घटनेमुळे महाकाळा गावावर शोककळा पसरली आहे.आज सायंकाळच्या सुमारास जोरदार अवकाळी आणि विजेच्या कडकडाटसह झालेल्या पावसात ही दुर्दैवी घटना घडली. गोविंद लहाने आणि आदित्य बेद्रे अशी वीज पडून मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावं आहेत.

सातारा – वीज कोसळून एकाचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून खंडाळा तालुक्यात महिलेच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. कराडवाडी येथील सोनाली अजित कराडे २९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, त्या शेतामध्ये शेळ्या चारत असताना ही दुर्घटना घडल्याचं समोर आलं. पावसामुळे जीवितहानीसह शेती आणि जनावरांचे मोठं नुकसान झालं आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वीज कोसळून 9 गाई मृत्यूमुखी

राहाता / अहिल्यानगर येथे वादळाने विजेची तार कोसळली आणि 9 गाईंचा मृत्यू झाला. राहता तालुक्यातील पाथरे गावातील घटना असून काल संध्याकाळी जोरदार वादळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं असून संजय घोलप यांच्या गोठ्यातील नऊ गाई मृत्यूमुखी पडल्या.

नांदेड- लहान गावात वादळी वऱ्यांसह अवकाळणी पाऊस, वीज पडून गाईचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यात वादळी वऱ्यांसह विजाच्या कडकडाटात पाऊस झाला. अर्धापूर तालुक्यातील लहान गावातील शेतकरी विठ्ठल नारायण कुदेवार यांच्या शेतातील आखाड्यावर बांधलेल्या गाईवर रात्री वीज कोसळून गाईचा मृत्यू झाला. दुभत्या गाईचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

बीड गेवराई तालुक्यातील उमापुर येथे वीज पडून 2 बैलांचा मृत्यू

बीड जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस पडला. यामध्ये काही भागात शेती पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. यादरम्यान गेवराई तालुक्यातील उमापूर येथील ज्ञानेश्वर लाळगे यांच्या दोन बैलांचा वीज पडून मृत्यू झाला तर बीड तालुक्यातील बोरफडी येथील अर्जुन घुगे यांच्या एका बैलाचा मृत्यू झाला आहे. पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडुन केली जात आहे.

बीड तालुक्यातील बोरफडी येथे वीज पडून बैलाचा मृत्यू

बीड तालुक्यातील बोरफडी गावात आज दुपारनंतर अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला. या दरम्यान वीज पडून शेतकरी अर्जुन घुगे यांचा एक बैल मृत्युमुखी पडला. बैल मृत्युमुखी पडल्याचे पाहून शेतकऱ्याने हंबरडा फोडला होता. यामुळे शेतकऱ्यावर संकट ओढावले आहे. दरम्यान पंचनामा करून शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.

सातारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वीज कोसळून शेळ्या मृत्यूमुखी

सातारा शहरासह वाई, जावळी,खंडाळा, कोरेगाव तालुक्यातील काही भागांमध्ये आज सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आणि गारांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. साधारण अर्धा तास पडलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. डाळा तालुक्यातील मोर्वे गावात वीज कोसळल्याने मेंढपाळ अमोल गोपाळ धायगुडे यांच्या 8 शेळ्या आणि 1 मेंढ्याचा जागीच मृत्यू झाला. यात त्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झालं आहे. वाई तालुक्यातील पांडवनगर (आसले) येथे झाडाखाली आश्रयाला थांबलेल्या मेंढपाळ नंदकुमार पिसाळ यांच्या 15मेंढ्यांवर वीज कोसळली. या घटनेत लाखो रुपयांचे पशुधन दगावल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या मोहरासह, काढणीला आलेल्या गहू आणि ज्वारीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. सातारा शहरासह ग्रामीण भागातील अनेक भागांत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची आणि कामावरून घरी परतणाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now