Baramati Plane Crash : बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांचं चार्टर विमान कोसळलं होतं. त्यात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्याच बारामतीत पुन्हा एकदा विमान अपघात झाला आहे.

बारामतीमध्ये पुन्हा विमान अपघात झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 28 जानेवारीला अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता. बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांचं चार्टर विमान कोसळलं होतं. त्यात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात महाराष्ट्राने आपल्या मोठ्या नेत्याला गमावलं होतं. आता त्याच बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान अपघात झाला आहे. हे ट्रेनिंग विमान होतं. प्रशिक्षण देणारं विमान होतं. यात विमानाचं नुकसान झालं आहे. पण सुदैवाने वैमानिकाचे प्राण वाचले. तो सुरक्षित आहे. गोजुबावी गावच्या हद्दीत हे शिकाऊ विमान कोसळलं आहे. रेडबर्ड कंपनीचं हे शिकाऊ विमान होतं.

बारामतीत पुन्हा एकदा शिकाऊ विमानाचा अपघात झालेला आहे. हा अपघात कशामुळे झाला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रेड बर्ड कंपनीच हे विमान असून गोजबाबी गावाच्या हद्दीत ते पडलेल आहे. यातील वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती आहे. याच गावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला होता. यापूर्वी देखील रेडबर्ड या कंपनीची विमानं या ठिकाणी कोसळलेली आहेत. या ठिकाणी शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जातं.


रेडबर्ड कंपनीवरती बंदी घालण्यात आलेली
कारवार एव्हिशन आणि रेड बर्ड या दोन संस्था बारामती मध्ये वैमानिक प्रशिक्षण देतात. यापूर्वी देखील रेडबर्ड कंपनीवरती बंदी घालण्यात आली होती. पुणे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी या घटनेबद्दल माहिती देताना सांगितलं की, बारामतीच्या गोजूबावी गावात विमानाने हार्ड लँडिंग केली. रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग कंपनीचं हे विमान होतं. याचवर्षी रांचीवरुन नवी दिल्लीला जाणाऱ्या याच कंपनीचं विमान कोसळलं होतं. त्यात सात जणांचा मृत्यू झालेला.
धावपट्टी लांबून जज करता येणं हा अनुभवाचा भाग
“टेबल टॉप धावपट्टीचा धोका असतो. पायलट जजमेंट सगळ्यात जास्त महत्वाची असते. व्यवस्थित पायलट देणं, विजन क्लियर असणं, धावपट्टी लांबून जज करता येणं हा अनुभवाचा भाग आहे. तरच टेबल टॉप धावपट्टीवर यशस्वी लँडिंग करता येतं” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील म्हणाले. “आज बारामतीत काय झालं? टेक्निकल अडचणी, धावपट्टीमुळे झालं यावर मी बोलू शकत नाही. जो पर्यंत डीजीसीए, विमान कंपन्या बोलत नाहीत तोवर मी बोलणं योग्य नाही” असं अनिल पाटील म्हणाले.
“दादांच्या विमान अपघाताच्या बाबतीत रोहित पवार यांची जी मागणी आहे, त्याला आमचा पाठिंबाच आहे. चौकशी झाली पाहिजे” असं अनिल पाटील यांनी सांगितलं.













