Vice President Election 2025: निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता असून, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नवीन उपराष्ट्रपतींची निवड होईल असे मानले जाते.
नवी दिल्ली: जगदीप धनखड यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता असून, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नवीन उपराष्ट्रपतींची निवड होईल असे मानले जाते.
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्याची जबाबदारी आयोगाची आहे. गृहमंत्रालयाने मंगळवारी धनखड यांच्या राजीनाम्याची औपचारिक घोषणा करताच, निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीशी संबंधित १९५२च्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, निवडणूक आवश्यक ठरली तर अधिसूचना प्रसृत झाल्यापासून ३२ दिवसांच्या आत त्या पदासाठी निवडणूक घेणे बंधनकारक असते. नियमांनुसार, निवडणुकीची अधिसूचना प्रसृत झाल्यापासून १४ दिवसांच्या आत पात्र उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.
निवडणुकीचा दिवस जाहीर करण्यापूर्वी आम्ही ‘इलेक्टोरल कॉलेज’ तयार करण्यासारख्या काही गोष्टींवर काम करत आहोत, असे आयोगाने म्हटले आहे. या अंतर्गत, लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व विद्यमान सदस्यांची मतदारयादी तयार केली जाईल. त्यानंतर निवडणूक अधिकारी आणि सहायक निवडणूक अधिकाऱ्यांबाबत निर्णय घेतला जाईल, असे आयोगाचे म्हणणे आहे. उपराष्ट्रपतिपदासाठी, सत्ताधारी पक्षांसोबत, विरोधी पक्षांनाही उमेदवार उभा करण्याचा अधिकार आहे. विरोधी पक्ष उमेदवार उभा करत नसतील तर सत्ताधारी पक्षांचा उमेदवार बिनविरोध निवडून येऊ शकतो.
अनेक नावे चर्चेत
उपराष्ट्रपतिपदासाठी रोज नवनवी नावे समोर येत आहेत. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, राज्यसभा उपसभापती हरिवंश, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा, दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना, तमिळनाडूचे राज्यपाल रवी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह आता लोकसभेच्या माजी उपसभापती रमादेवी यांचेही नाव चर्चेत आले आहे. माजी भाजप खासदार रमादेवी यांचे पती, बिहारचे माजी मंत्री व राजद नेते बृजबिहारी प्रसाद यांची जून १९९८मध्ये पाटण्याच्या आयजीआयएमएस रुग्णालयात गोळ्या घालून हत्या झाली होती. त्या उपसभापतिपदाची जबाबदारी सांभाळत असताना, सपा नेते आझम खान व त्यांच्यातील शाब्दिक चकमक देशभरात गाजली होती. त्यावरून खान यांना लोकसभेत माफी मागावी लागली होती
संबंधित बातम्या





तुमच्यासाठी
नारळ पाणी प्यायल्यामुळे तुमच्या पोटाचं आरोग्य राहिल निरोगी जाणून घ्या फायदे