उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बारामती पोटनिवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली. वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीत पार्थ पवार आणि सुनील तटकरेही उपस्थित होते.

राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत आहे. त्यातच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेसाठीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. सध्या या पोटनिवडणुकीचे वारे वेगाने वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून आकाश मोरे यांना संधी देण्यात आली आहे. आता याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. या महत्त्वाच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
सुनेत्रा पवार आज सकाळी ११ च्या सुमारास वर्षा बंगल्यावर दाखल झाल्या. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री हसन मुश्रीफ हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुमारे एक तास ही बैठक चालली. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडून विशेष रणनीती आखली जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बारामतीची जागा जिंकण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र मिळून कोणती नवी समीकरणे मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीत देवेंद्र फडणवीसांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना एक महत्त्वाचा शब्द दिला आहे. बारामती पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी उभा राहील. तसेच सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती मदत करु, असे सांगितले आहे.
महायुतीमधील समन्वयावरही सकारात्मक चर्चा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत प्रामुख्याने बारामती मतदारसंघातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे बोललं जात आहे. आगामी पोटनिवडणुकीत महायुतीचे ताकद प्रदर्शन कसे असावे आणि समन्वयाने निवडणूक कशी लढवावी, यावर या बैठकीत भर देण्यात आला. यासोबतच राज्यातील इतर संघटनात्मक मुद्दे आणि महायुतीमधील समन्वयावरही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
२३ एप्रिलला बारामतीत मतदान
दरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे, ज्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बारामतीची ही रिक्त झालेली जागा कायम राखण्यासाठी त्यांना महायुतीच्या अधिकृत उमेदवारी देण्यात आली. या जागेसाठी काँग्रेसने ॲड. आकाश विश्वनाथ मोरे यांना बारामतीतून उमेदवारी जाहीर केली आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने अद्याप आपला उमेदवार दिलेला नाही. सध्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सध्या राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे.









