India vs New Zealand Icc Champions Trophy 2025 Final Match Result : टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील सलग आणि एकूण पाचवा विजय ठरला.
टीम इंडियाने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवला आहे. रोहितसेनेने अंतिम सामन्यात किवींवर 4 विकेट्सने मात करत ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 6 विकेट्स गमावून 49 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाने 254 धावा केल्या. टीम इंडियाची ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची एकूण तिसरी वेळ ठरली. तसेच टीम इंडियाने या विजयासह न्यूझीलंडचा 25 वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता केला.
पहिल्या डावात काय झालं?
दरम्यान त्याआधी टॉस जिंकून न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 251 धावा केल्या. डॅरेल मिचेल आणि मायकल ब्रेसवेल या दोघांनीा सर्वाधिक धावा केल्या. डॅरेल मिचेल याने 63 तर मायकल ब्रेसवेलने 53 धावांचं योगदान दिलं. रचीन रवींद्र याने 37 तर ग्लेन फिलिप्सने 34 धावा केल्या. तर टीम इंडियसााठी कुलदीव यादव आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड
टीम इंडियाने या विजयासह वर्ल्ड रेकॉर्ड केला. टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची ही तिसरी वेळ ठरली. आतापर्यंत एकाही संघाला 3 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकता आलेली नाही. टीम इंडियाने याआधी 2002 (संयुक्त विजेता) आणि 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती. त्यानंतर आता 14 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघाने ही कामगिरी केलीय.
पराभवाची अचूक परतफेड
टीम इंडियाने अंतिम सामन्यात किंवीवर विजय मिळवत 25 वर्षांआधीच्या पराभवाची परतफेड केली. याच न्यूझीलंडने टीम इंडियाला 2000 साली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभूत केलं होतं. टीम इंडियाने आता किवींना पराभूत करत परतफेड केली.
टीम इंडियाचा दुबईतील 10 वा विजय
टीम इंडियाने या विजयासह दुबईत अजिंक्य राहण्याचा विक्रम कायम राखला. टीम इंडियाचा हा या स्टेडियममधील 11 वा सामना होता. भारताचा हा दुबईतील 10 वा एकदिवसीय विजय ठरला. तर एकमेव मॅच टाय झाली होती.