प्रवाशांनी भरलेली बस पद्मा नदीत कोसळून २३ जणांचा मृत्यू झाला आहे. ईदहून परतणाऱ्या प्रवाशांवर काळाने झडप घातली असून सध्या बचावकार्य सुरू आहे. घाई आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
ईदचा आनंद साजरा करून आपल्या घरी परतणाऱ्या प्रवाशांसाठी बुधवारची संध्याकाळ घातकी ठरली. प्रवाशांनी गच्च भरलेली एक बस राजबारी जिल्ह्यातील दौलतडिया टर्मिनल येथे फेरीवर चढत असताना थेट पद्मा नदीच्या खोल पात्रात कोसळली. या भीषण अपघातात लहान मुलांसह किमान २३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बांग्लादेशाची राजधानी ढाका या ठिकाणी ही घटना घडली असून संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बांग्लादेशातील राजबारी जिल्ह्यातील दौलतडिया टर्मिनल येथे बुधवारी संध्याकाळी ५.१५ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही बस प्रवाशांना घेऊन मोठ्या फेरीवर चढण्याचा प्रयत्न करत होती. बांग्लादेशात नद्या ओलांडण्यासाठी बस आणि इतर वाहने अशा मोठ्या फेऱ्यांचा वापर करतात. मात्र, फेरीवर चढत असताना अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस थेट खोल नदीपात्रात कोसळली. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
या व्हिडीओत ही बस दुर्घटना कशी घडली हे पाहायला मिळत आहे. यात सुरुवातीला बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ती बस थेट नदीपात्रात जाऊन कोसळल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी या बसमध्ये काही प्रवाशी होते. ही बस नदी पात्रात कोसळल्यानंतर त्यातील ज्या प्रवाशांना पोहता येत होतं, त्याचा जीव बचावला. मात्र इतरांना जलसमाधी मिळाली आहे. या घटनेनंतर फेरीवर असलेले बसमधील इतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
तर काही प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार बस फेरीकडे जात असताना एका छोट्या बोटीला धडकली. त्यानंतर हा भीषण अपघात झाला. यावेळी बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते. जे ईदच्या सुट्ट्या संपवून राजधानी ढाकाकडे परतत होते.
६ तासांनी बस नदीबाहेर
या अपघाताची माहिती मिळताच लष्कर, पोलीस, अग्निशमन दल आणि तटरक्षक दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, खराब हवामानामुळे बचावकार्यात मोठे अडथळे येत होते. सुमारे ६ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हमजा नावाच्या विशेष जहाजाच्या आणि क्रेनच्या साहाय्याने बसला मध्यरात्री नदीबाहेर काढण्यात आले. यावेळी सुरुवातीला दोन महिलांचे मृतदेह सापडले होते. त्यानंतर बस बाहेर काढल्यावर त्यात आणखी २१ मृतदेह आढळले. या अपघातातून ११ प्रवाशांनी पोहून आपले प्राण वाचवले आहेत. तर काही प्रवासी अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान बांग्लादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी या दुर्घनेतील बचाव कार्याचा आढावा घेतला आहे. या भीषण अपघाताच्या सखोल चौकशीचे आदेश सरकारने दिले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, घाई आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.










