पुण्यात एका रिक्षा चालकावर भरदिवसा तिघांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.

पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघत आहेत. कात्रज चौक ते नवले ब्रिज या हायवेवर राजमाता भुयारी मार्गा जवळील दत्तनगर चौकात काल एका रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. काल १८ मे २०२६ रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडलेल्या सनसनाटी घटनेचा व्हिडीओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेअर करत सरकारला जाब विचारला आहे.
पुण्यात कोयता गँगचा उच्छात कायम असताना दिवसा ढवळ्या एका रिक्षा चालकावर जुन्या वादातून कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. काल सोमवारी सकाळी नवले ब्रिज या मार्गावरील राजमाता भुयारी मार्गावर ही घटना घडली आहे. या घटनेत सुरज माणिक काळे ( ३० रा. कात्रज, पुणे ) याच्यावर धारदार कोयत्याने हल्ला झाला आहे. या प्रकरणात हा सुरज काळे याच्यावर लागोपाट वार झाल्यानंतर तो पुलावर खाली कोसळल्याचे व्हिडीओत दिसत आहे. या प्रकरणात आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज काळे हा पेशाने रिक्षा चालक असून अन्य तिघा रिक्षा चालकांना त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. या प्रकरणात या रिक्षा चालकात दोन ते तीन वर्षांपासून वाद सुरु होते. ही दुश्मनी रिक्षा प्रवासी बसवणे आणि रिक्षा स्टँडमधील वर्चस्वावरुन सुरु झाल्याचे समजते. त्यामुळे हळूहळू या दुश्मनीचे रुपांतर हिंसक हल्ल्यात झाले. घटनेदिवशी आरोपींनी सुरज काळे याला घेरले आणि त्याच्यावर हत्यारांनी केला. तो गंभीर जखमी होऊन पुलावर भुयारी मार्गाच्या समोर कोसळला. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
तिघा हल्लेखोरांना अटक
आंबेगाव पोलिसांनी या प्रकरणात तातडीने तिघा रिक्षा चालकांना अटक केली आहे. बाळासाहेब भोसले (वय ३५ वर्षे, रा. ता. वेल्हा, जिल्हा पुणे), गणेश हरिभाऊ धारपाले (वय २७ वर्षे, रा. ता. भोर, जिल्हा पुणे) आणि गणेश ऊर्फ भावड्या हरिभाऊ धरपाळे (वय ३६ वर्षे, रा. आंबेगाव पठार, पुणे) अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व आरोपी पुण्यातील वेगवेगळ्या भागात रहाणारे आहेत. या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी पोस्ट करत राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर टीका केली आहे.













