रितेश भाऊंनी सागर एलिमिनेट झाल्याचं जाहीर केलं. घरातील सदस्यांची धावती भेट घेत कसलाही ड्रामा न करता सागर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचा सहावा सीजन सध्या प्रचंड चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातून 85 दिवसांनी सागर कारंडे (Sagar Karande)घराबाहेर पडला. गेल्या आठवड्याभरात बिग बॉसच्या घरात अनेक राडे, भांडण आणि फिनालेमध्ये जाण्यासाठी प्रत्येकच स्पर्धकाचा टॉप गेम दिसला. पण आठवड्याच्या शेवटी विशाल आणि सागरपैकी सागर एलिमिनेट झाला. घरातून बाहेर पडताना ना कसला ड्रामा, ना कसली रडापडी करता सागरने हसत घरातील स्पर्धकांचा निरोप घेतला. गेल्या काही आठवड्यांपासून सागरचा गेम हवा तसा आकाराला येत नव्हता. ‘फॅमिली वीक’नंतर तो अधिकच खचल्याचं दिसलं. त्यानं त्याच्या मनातलं ही रितेश भाऊंना बोलून दाखवलं होतं. अखेर बिग बॉसच्या घराचा निरोप घेत तो बाहेर पडला. कलर्स मराठीने नुकताच सागरचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दरम्यान, बिग बॉस मराठी 6 आता शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबला आहे. खेळ आता काहीच आठवड्यात संपणार आहे. बिग बॉसचा महाअंतिम सोहळा 19 एप्रिल 2026 ला पार पडणार असल्याचं बोललं जातंय. आता तिकीट टू फिनाले लवकरच बिग बॉसच्या घरात पार पडणार आहे. सात स्पर्धकांमध्ये पॉवरफुल खेळी शेवटच्या काही दिवसात रंगणार आहे.
सागर कारंडे घराबाहेर
विशाल आणि सागर या दोघांपैकी एक जण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार होता . रितेश भाऊंनी सागर एलिमिनेट झाल्याचं जाहीर केलं. घरातील सदस्यांची धावती भेट घेत कसलाही ड्रामा न करता सागर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. घराबाहेर पडताना घरातील अनेक सदस्य भावुक झाले होते. सागर कारंडे खेळाच्या उत्तरार्धात टोळीसोबत दिसून येत होता. त्यामुळे सागरला निरोप देताना टोळीतील सदस्य फार भावुक झालेले. अनुश्रीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. तर विशाललाही रडू आवरलं नाही. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना कितीही जड जात असलं तरी सागरच्या चेहऱ्यावर निघताना समाधानाचे हसू होतं.
रितेश भाऊंना भेटताच आपल्या प्रवासाविषयी सांगताना सागर म्हणाला ‘ आत्तापर्यंतचा प्रवास अमेझिंग होता. मला नाही वाटत मी मरेपर्यंत हा प्रवास विसरू शकेन .जे 80 85 दिवस मी घरात होतो ते कधीही विसरणार नाही. हे सगळे दिवस फास्ट फॉरवर्ड केल्यासारखे होते.मी महाराष्ट्रातील सगळ्यांना विनंती करतो की ज्यांना बिग बॉसच्या घरात येण्याचे संधी मिळेल त्यांनी कधीच नाही म्हणू नका.तुमचा आयुष्य बदलून टाकणारा हा शो आहे. ”
त्यानंतर रितेश भाऊंनी आजपर्यंत सागरचा प्रवास सगळ्यांना दाखवला. आपला प्रवास पाहताना सागर भावूक झाला होता.






