NCP Sunetra Pawar Letter: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार विरुद्ध तटकरे-पटेल अशा संघर्ष निर्माण झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

NCP Sunetra Pawar Letter: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत सुरु असलेल्या रंजक घडामोडींनंतर एक नवा ट्विस्ट आला आहे. सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निवडणूक आयोगाला (Election Commission) पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी 28 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीत झालेला पत्रव्यवहार ग्राह्य धरु नये, अशी विनंती केली होती. मात्र, आता हेच पत्र सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडून मागे घेतले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कारण या पत्रामुळे पार्थ पवार (Parth Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत येऊ शकतो, असे सांगितले जाते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी हे पत्र मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. (Maharashtra Politics news)
सुनेत्रा पवार यांनी लिहलेल्या या पत्रामुळे 16 फेब्रुवारी रोजी तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी आयोगाला पाठवलेले पत्र रद्द होत होते. यामुळे पार्थ पवार यांच्या राज्यसभा खासदारकीसाठी करण्यात आलेला पत्रव्यवहार आणि देण्यात आलेली कागदपत्रे बाद ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 28 जानेवारी ते 10 मार्च या काळात दरम्यानच्या काळात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड, प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष पदाची निवड करण्यात आल्याबाबतचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे मिनिटस देखील आयोगाला पाठवण्यात आले होते. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्रानुसारच पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली.
तसेच त्यांच्या राज्यसभा निवडणुकीच्या एबी फॉर्मवरील सह्या करण्यात आल्या. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी पाठवलेल्या पत्रानुसार त्यापूर्वी पाठवण्यात आलेले प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचे पत्र ग्राह्य धरले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील पुढील सर्व निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. ही बाब काही नेत्यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर आता सुनेत्रा पवार 10 मार्च रोजीचे पत्र निरस्त करण्याची विनंती आयोगाला करणार असल्याचे समजते.
NCP Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांनी नेत्यांशी सल्लामसलत न करताच निवडणूक आयोगाला पत्र पाठवले?
सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात 28 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेला पत्रव्यवहार रद्द करण्याची विनंती केली होती. त्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी 16 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला पाठवलेले पत्रही रद्द ठरले होते. सुनेत्रा पवार यांनी पक्षातील कोणत्याही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा न करताच हे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते. हे पत्र पाठवण्यामागे पार्थ पवार यांची महत्त्वाची भूमिका असल्याचीही चर्चा आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या मागणीनुसार 28 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पत्रव्यवहार रद्द ठरवला तर त्यानंतर झालेल्या पक्षातील एकंदर निवडप्रक्रियाच अवैध ठरु शकते.
स्वत: सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड, पार्थ पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी सादर केलेली कागदपत्रेही बाद ठरु शकता. सध्या सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत सुरु असलेल्या न्यायप्रविष्ट प्रकरणात अडचणी निर्माण होऊ शकता, असे जाणकारांचे म्हणणे आहे. ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाला त्यांनी स्वत:च पाठवलेले पत्र निरस्त करण्याची मागणी केली जाऊ शकते.








