Sunetra Pawar on Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला (Ajit Pawar Death) आज 28 फेब्रुवारी 2026 रोजी एक महिना पूर्ण झाला आहे. 28 जानेवारी 2026 हा दिवस राज्यासाठी काळा दिवस ठरला. बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात (Baramati Plane Crash) अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी ते विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीजवळ लँडिंगच्या तयारीत असताना विमान कोसळले. हा अपघात अत्यंत भीषण होता. या दुर्घटनेत अजित पवारांसह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाला आज एक महिना झालेला असताना त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी एक व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.
सुनेत्रा पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलंय की, जिवाभावाचा माणूस… माणुसकीची खोल जाण, काम करण्याची अखंड प्रामाणिक तळमळ आणि समाजासाठी झटण्याची अविरत वृत्ती, हेच अजितदादांचे खरे व्यक्तिमत्त्व होते. जनहितासाठी सत्ता वापरण्याची त्यांची ठाम भूमिका, दूरदृष्टीतून उभा केलेला विकासाचा मार्ग आणि कामातून कमावलेला जनतेचा अपार विश्वास, हेच त्यांच्या जीवनकार्याचे खरे विश्व होते.
जिवाभावाचा माणूस…
माणुसकीची खोल जाण, काम करण्याची अखंड प्रामाणिक तळमळ आणि समाजासाठी झटण्याची अविरत वृत्ती, हेच अजितदादांचे खरे व्यक्तिमत्त्व होते. जनहितासाठी सत्ता वापरण्याची त्यांची ठाम भूमिका, दूरदृष्टीतून उभा केलेला विकासाचा मार्ग आणि कामातून कमावलेला जनतेचा अपार विश्वास,… pic.twitter.com/rXeI5GeSYX
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) February 28, 2026
Sunetra Pawar on Ajit Pawar Death: त्यांच्या उणीवेची वेदना मनाला सतत जाणवते, पण…
स्वभावाने दिलदार आणि आपुलकीने माणसं जोडणारे, तर निर्णयाच्या वेळी तितकेच रोखठोक आणि विकासाभिमुख नेतृत्व, अशी त्यांची वेगळी ओळख होती. प्रत्येक समाजघटकाला आधार देत त्यांनी सातत्याने “विकासाचे राजकारण” जपले. आज त्यांच्या उणीवेची वेदना मनाला सतत जाणवते; पण त्यांचे विचार, त्यांची कार्यतत्परता आणि राष्ट्रवादी परिवाराला त्यांनी दिलेले बळ मला आणि आपणा सर्वांना पुढे जाण्याची नवी प्रेरणा देत राहील. अजितदादा सदैव आपल्या स्मरणात.. आपल्या विचारांत, आपल्या कृतीत, आपल्या प्रत्येक कामात त्यांचे प्रतिबिंब कायम दिसत राहील, अशा भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्यात.








